संजय राऊतांना फार गांभीर्याने घेऊ नका, ते एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का?, फडणवीसांचा खोचक सवाल

| Updated on: Nov 29, 2021 | 3:43 PM

संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांबाबत बोलले का? एकदा तरी अतिवृष्टीवर बोलले का, एकदा तरी पुराबाबत बोलले का, एकदा तरी विजेचे कनेक्शन कापले जात आहेत त्यावर बोलले का एकदा तरी गावं अंधारात आहेत त्यावर बोलले का, आत्महत्या होत आहेत त्यावर बोलले का... नाही... नाही बोलले. कारण त्यांना हेच काम आहे', असा जोरदार टोला फडणवीस यांनी राऊतांना लगावलाय.

संजय राऊतांना फार गांभीर्याने घेऊ नका, ते एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का?, फडणवीसांचा खोचक सवाल
देवेंद्र फडणवीस, संजय राऊत
Follow us on

मुंबई : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी सुरु आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी नवीन वर्षात हे सरकार जाणार असं वक्तव्यं केलं. त्याला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार पलटवार करत पाटील यांनी आतापर्यंत 28 वेळा असं वक्तव्य केलं आहे की सरकार जाईल. त्याची आपल्याकडे नोंद आहे. राऊतांच्या या टीकेबाबत विचारलं असता आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांवर जोरदार हल्ला चढवलाय.

देवेंद्र फडणवीस यांनी आज टीव्ही 9 मराठीला विशेष मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर सविस्तर उत्तरं दिली. संजय राऊतांबाबत विचारलं असता, फडणवीस म्हणाले की, ‘संजय राऊतांचं काय आहे, ते मनात आला तो आकडा सांगतात. संजय राऊतांना तुम्ही फार गंभीरपणे घेऊ नका. या सरकारने काही लोक असे नियुक्त केले आहेत की त्यांना कामच असं आहे की रोज सकाळी कॅमेऱ्यासमोर उभं राहून जनतेच्या जिव्हाळ्याच्या गोष्टी, महत्त्वाच्या आणि आवश्यक गोष्टींकडून नरेटीव्ह दुसरीकडे न्यायचा. ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याची चर्चा हे करतात. तुम्ही मला सांगा संजय राऊत एकदा तरी शेतकऱ्यांबाबत बोलले का? एकदा तरी अतिवृष्टीवर बोलले का, एकदा तरी पुराबाबत बोलले का, एकदा तरी विजेचे कनेक्शन कापले जात आहेत त्यावर बोलले का एकदा तरी गावं अंधारात आहेत त्यावर बोलले का, आत्महत्या होत आहेत त्यावर बोलले का… नाही… नाही बोलले. कारण त्यांना हेच काम आहे’, असा जोरदार टोला फडणवीस यांनी राऊतांना लगावलाय.

‘महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधामुळेच पडेल’

‘भारताचा राजकीय इतिहास पाहिला तर अशी सरकारं फार काळ चालत नाहीत. ती अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार अंतर्विरोधाने पडतात त्यावेळी आज पडेल की उद्या पडेल हे सांगता येत नाही. जेव्हा सरकार सर्वात मजबूत आहे असं वाटतं तेव्हाच ते पडतं. जेव्हा आता पडेल असं वाटतं तेव्हा ते टिकतं. त्यामुळे ही अशी सरकारे टिकत नाहीत. ते आपल्या अंतर्विरोधानेच पडेल. पहिल्या दिवशीपासून सांगतोय आम्ही सरकार पाडणार नाही. ज्या दिवशी सरकार पडेल. तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ’, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.

‘..म्हणूनच सत्तारुढ पक्षाला चिमटे बसतात’

‘विरोधी पक्ष म्हणून आम्ही विरोधी पक्षाच्या मोडमध्ये आहोत. जनतेचे प्रश्न मांडत आहोत. पूर आला तरी आम्ही पोहोचतो. अतिवृष्टी झाली तरी आम्ही पोहोचतो, शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही गेलो. चिखलात जाऊन आम्ही त्याचं दुख: बघितलं आहे. एक दिवस आम्ही घरी बसलो नाही. विरोधी पक्षाचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत. म्हणूनच सत्तारुढ पक्षाला त्याचे चिमटे बसत आहेत. त्यामुळेच ते बोलत आहेत, असा जोरदार टोलाही फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावलाय.

इतर बातम्या :

लॉकडाऊनची परिस्थिती नाही, निर्बंधाबाबत सरकारनं आम्हाला विचारात घ्यावं, फडणवीसांचं आवाहन

Anil parab : हिवाळी अधिवेशनच्या तारखा ठरल्या, लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांनाच अधिवेशनात प्रवेश