Devendra Fadnavis : ‘राज ठाकरे भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं’ राज यांच्या पत्रानंतर फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

| Updated on: May 10, 2022 | 7:33 PM

मनसे पदाधिकाऱ्यांवर होत असलेल्या कारवाईवरुन राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. या पत्रातून द्यांनी ठाकरे सरकारला इशाराही दिलाय. राज यांच्या या पत्रानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Devendra Fadnavis : राज ठाकरे भाबडी अपेक्षा ठेवतील असं वाटलं नव्हतं राज यांच्या पत्रानंतर फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. मशिदींवरील भोंग्यांविरोधात राज यांनी आंदोलनच सुरु केलं. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्र पोलीसांकडूनही मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येतेय. अनेक मनसैनिकांना नोटीस, अनेकांची धरपकड केली जात आहे. अशावेळी राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच इशारा दिलाय. ‘गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?’, असा सवाल राज यांनी केला आहे. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिलीय. फडणवीस यांनी राज ठाकरेंना महत्वाचा सल्ला देत ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

‘सरकारकडून यापेक्षा अपेक्षाच त्यांनी ठेवायला नको होती’

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या सरकारमध्ये यापेक्षा वेगळी अपेक्षाच त्यांनी ठेवायला नको होती. इतकी भाबडी अपेक्षा राज ठाकरे ठेवतील असं मला वाटलं नव्हतं. जे सरकार लांगुलचालन करतंय. ज्या सरकारने इतक्या मर्यादा सोडल्या की हनुमान चालिसा म्हणायची घोषणा केल्यानंतर राजद्रोहाचा खटला दाखल केला जातोय. खासदार आमदारांना 12 दिवस जेलमध्ये ठेवलं जातंय, त्यांच्याबाबत दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. मला असं वाटतं की या सरकारच्या विरोधात आम्ही तर लढतच आहोत, त्यांनीही लढलं पाहिजे, असा सल्लाही फडणवीस यांनी यावेळी राज ठाकरे यांना दिला आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांनाही खोचक टोला

फडणवीस यांनी शरद पवारांवरही टीका केलीय. ‘मला असं वाटतं की पवार साहेबांनी महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष दिलं तर अधिक चांगलं होईल. महाराष्ट्रातील शेतकरी, गरीब, आदिवासी, युवक, महिला, बारा बलुतेदारांसमोर असलेले प्रश्न, याकडे एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्या सरकारला निर्देश दिले तर ते अधिक चांगलं होईल. देशात मोदींचं सरकार उत्तम काम करत आहे, लोक मोदींवर खुश आहेत. लोकांनी वारंवार मोदींवर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता पवार साहेबांच्या बहुमूल्य सल्ल्याची आवश्यकता श्रीमान उद्धव ठाकरे यांना आहे’, असा खोचक टोलाही फडणवीसांनी पवारांना लगावलाय.

राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा

‘गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की; मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी ‘धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का? आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामाच्या हैद्राबाद संस्थानातले ‘रझाकार’ आहेत! अर्थात, महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन, तमाम हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत’.

‘राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!’, असा थेट इशारा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलाय.