महाराष्ट्रात कायद्याचे नाही तर ‘काय ते द्या’चे राज्य; भ्रष्टाचार, वसुलीच्या आरोपासह फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Nov 16, 2021 | 6:07 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर 'काय दे'चे राज्य सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलाय.

महाराष्ट्रात कायद्याचे नाही तर काय ते द्याचे राज्य; भ्रष्टाचार, वसुलीच्या आरोपासह फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
भाजप कार्यकारिणी बैठक
Follow us on

मुंबई : अमरावती, नांदेड आणि मालेगावातील हिंसाचार, राज्यात सामुहिक बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, वसुली आणि भ्रष्टाचाराचे आरोप या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य उरले नाही तर ‘काय दे’चे राज्य सुरु असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. मुंबईत आज भाजप कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलाय. (Devendra Fadnavis criticizes Thackeray government on Amravati riots, gang rape, murder, corruption)

राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे. राज्यात दहशतवाद्यांशी व्यावसायिक संबंध ठेवले जात आहे. आज जिल्ह्या जिल्ह्यात मंत्री, आमदार, खासदारांचं अवैध रेती, अवैध दारूचं नेक्सस सुरु आहे. महाराष्ट्रात यापूर्वी अशी अवस्था कधीही पाहिली नव्हती. या सरकारमध्ये कायद्याचे राज्य नाही तर ‘काय दे’चे राज्य आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांची नुसती वाटमारी चालली आहे आणि शेतकऱ्यांकडे मात्र कुणीही पाहायला तयार नाही. एका मुलीवर 400 लोक बलात्कार करतात, काय चालले आहे महाराष्ट्रात? सरकार म्हणते आम्ही शक्ती कायदा करु. पण सरकारमध्ये केवळ ‘भक्ती’ उपक्रम चालू आहे, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केलीय.

‘हिंसाचाराची घटना साधी नाही, तर तो एक प्रयोग’

नांदेड, अमरावती, मालेगावात घडलेली घटना साधी मानू नका. हा एक प्रयोग आहे. देशात अराजक निर्माण करण्यासाठी, केंद्र सरकारविरोधात विचारपूर्वक केलेला प्रयोग आहे. 26 ऑक्टोबरला बांग्लादेशात हिंदूंवर अत्याचार होतात. त्याचा निषेध म्हणून त्रिपुरात मोर्चा निघतो. 28 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट पसरवल्या जातात. तेव्हा मशिदीचा फोटो टाकला जातो. दिल्लीतील एका रेफ्युजी कँपला लागलेल्या आगीचा फोटो दाखवून त्रिपुरात कुराण जाळण्यात आल्याचं सांगितलं जातं. जुन्या मिरवणुकीचे फोटो दाखवून हिंदू मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अन्याय करत असल्याचा आरोप केला जातो. दु:खद बाब ही की देशाचे एक मोठे नेते राहुल गांधी यांना सर्व माहिती असूनही 8 नोव्हेंबरला ते ट्विट करतात की, त्रिपुरात खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिमांवर अत्याचार होतोय. लगेच 11 नोव्हेंबरला नांदेड, अमरावती, मालेगावात मुस्लिमांचे मोठे मोर्चे निघतात. एकाच वेळी वेगवेगळ्या शहरात हे कसं घडू शकतं. हे सर्व राज्य सरकारच्या समर्थनातून निघालेले मोर्चे आहेत, असा गंभीर आरोप फडणवीस यांनी केलाय.

‘कोण होतास तू… काय झालास तू…’

ज्यावेळी हिंदूंची दुकानं जाळली गेली त्यावेवळी मविआचा एक तरी नेता बोलला का? मला आश्चर्य वाटतं ते संजय राऊत यांचं. मला गाण आठवतं की कोण होतास तू, काय झालास तू…. ते म्हणतात भाजपनं दंगल घडवली. नवाब मलिकांचा तर प्रश्नच नाही. कारण ते हर्बल तंबाखू लावतात… कव्हर फायरिंग म्हणून मलिकांनी मुंबईतून पैसे दिले गेल्याचं सांगितलं. अमरावतीत आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली गेली. अमरावतीत एसआरपीच्या 7 कंपन्या होत्या. पण त्यांना आदेशच दिला गेला नाही. पुढे हाताबाहेर गोष्टी गेल्यावर त्यांना आदेश दिला गेला. त्यावेळी त्यांच्यावर हल्ले झाले. आझाद मैदानावर असाच पॅटर्न राबवला गेला. अचानक कोल्हापूर गेट, नागपूर गेटवरुन टोकदार गोटे आले कसे? एसआरपीच्या जवान जखमी झाल्यानंतर एकाला तरी अटक झाली का? असा सवाल फडणवीस यांनी केलाय.

इतर बातम्या :

आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारावाच लागेल, रस्त्यावर उतरावेच लागेल; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

मालेगावची घटना हा प्रयोग, देशात अराजक माजवण्याचा हा डाव; देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप

Devendra Fadnavis criticizes Thackeray government on Amravati riots, gang rape, murder, corruption