Devendra Fadnavis : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात पण कसे? शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आकड्यांचा खेळ समजून घ्या

| Updated on: Jun 21, 2022 | 5:12 PM

शिवसेनेचे 26 आमदार असल्याचीही माहिती मिळतेय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळलं तरी भाजपचते सत्तास्थापनेसाठी बहुमत आहे का? असा सवालही विचारला जातोय.

Devendra Fadnavis : फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात पण कसे? शिंदेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आकड्यांचा खेळ समजून घ्या
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानं शिवसेनेत मोठा भूकंप, तर महाविकास आघाडी सरकारला मोठा हादरा बसल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) मतं फुटली आणि भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्या पाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडीची मोठ्या प्रमाणात मतं फुटली आणि तिथेही भाजपचा उमेदवार विजयी झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज विजयी जल्लोष अपेक्षित होता पण राज्यात मोठ्या राजकीय हालचाली पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे हे विधान परिषद निवडणूक निकालानंतर रात्रीच सूरतला पोहोचले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे (Shivsena) 26 आमदार असल्याचीही माहिती मिळतेय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळलं तरी भाजपचते सत्तास्थापनेसाठी बहुमत आहे का? असा सवालही विचारला जातोय.

आकड्यांचं गणित कसं जुळणार?

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी 145 हा जादूई आकडा गाठणं गरजेचं आहे. मात्र, भाजपकडे केवळ 106 आमदार आहेत. तर काही अपक्षांची मिळून भाजपची संख्या 113 वर पोहोचते. तरीही भाजपला जादूई आकडा गाठणं सहजसाध्य नाही. पण शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आता भाजप महाविकास आघाडीला हादरा देणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या 26 आमदार सूरतमध्ये आहेत. त्यामुळे भाजपचे 113 आणि शिंदे यांच्यासोबत असलेले 26 आमदार मिळून भाजपकडे 139 इतका आकडा होतो. तसंच मनसेचा एक आमदारही भाजपला मदत करेल, त्यामुळे भाजपचं संख्याबळ 140 होईल. तरीही भाजपला 5 आमदार कमी पडतील.

दुसरी एक शक्यता अशी आहे की राज्यसभा निवडणुकीत भाजपला एकूण 123 मतं मिळाली होती. तर विधान परिषद निवडणुकीत हाच आकडा 134 वर पोहोचला. हाच आकडा कायम धरला तर आता भाजपला केवळ 11 आमदारांची गरज उरते. अशावेळी शिंदे यांच्या बंडाळीनंतर भाजप जादूई आकडा गाठेल असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी सरकारला मोठा धोका असल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपचं गणित काय असू शकतं?

>> भाजप – 106
>> एकनाथ शिंदे गट – 26
>> अपक्ष – 13
>> मनसे – 1

>> एकूण – 146

शिंदे गट रात्री शहा नड्डांना भेटणार- सूत्र

दरम्यान, आज रात्री गांधीनगरला एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तसंच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत बैठक होणार असून त्यानंतर भाजपची पुढची रणनिती आखली जाईल. महत्वाची बाब म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत. फडणवीस देखील संध्याकाळी शाह आणि नड्डा यांच्यासोबत गांधीनगरला पोहोचतील आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीत फडणवीसही सहभागी होण्याची शक्यता आहे.