Manoj Jarange: लवकरच भगवं वादळ घोंगावणार? अंतरवाली सराटीतून पुन्हा मराठा आंदोलनाचा एल्गार? मनोज जरांगेच्या नेतृत्वात बैठक…
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची मराठा अभ्यासकांसोबत अंतरवाली सराटीत बैठक सुरू आहे. उपचार सुरू असतानाच त्यांनी अचानक सराटी जवळ केली. 29 ऑगस्ट ही आंदोलनाची तारीख आता जवळ येऊन ठेपली आहे. सरकारविरोधात त्यांची तोफ धडाडत आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात हे प्रकर्षाने दिसले.

मराठा अभ्यासकांसोबत मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीत बैठक सुरू झाली आहे. मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटपून मनोज जरांगे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना ताप आणि इतर त्रास सुरू होता. पण अचानक उपचार मध्येच थांबवत त्यांनी अंतरवाली सराटी जवळ केली. त्यांच्या या भूमिकेने अनेकांना नवल आणि चिंता वाटली. गेल्या आठवड्यात त्यांनी सरकारविरोधात सातत्याने विधानं केली. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे दिसून आले. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. 29 ऑगस्टपासून अंतरवाली सराटीतून त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने मराठ्यांनी पुन्हा फसवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासकीय परिपत्रकातील आणि निर्णयातील त्रुटी काय हे दाखवण्यासाठी आणि कुठे काय चुकलं हे समजून घेण्यासाठी आज मराठा अभ्यासकांसोबत ते चर्चा करत आहेत.
चुका असतील तर दुरूस्त करुयात
जीआर चुकला असं नंतर बोंबलता कशाला, काही चुकलं तर येऊन सांगा. सुधारणा असतील सुचवा. काय झाल आता, अजून कसं होत नाही? असे सवाल करणाऱ्यांना जरांगे पाटील यांनी झोंबणारा सवाल केला. या बैठकीत अभ्यासकांनी आता बोलावं. सन्मानं या आणि सन्मानं जा. आपल्या समाजाचे खूप हाल करण्यात आले. चूक झाली असेल तर ती सांगा. दुरुस्त करूयात. सुधारणा केल्याने आपण मोठे होऊत. नाहीतर नाहक मोठी दरी निर्माण होईल. तुमच्या आणि माझ्या भांडणात समाजाचं नुकसान होऊ नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
यावेळी अभ्यासकांनी त्यांना हैदराबाद गॅझेटपासून ते सातारा गॅझेटपर्यंत, व्हॅलिडिटीचा विषय, सगेसोयऱ्याचा उल्लेख जीआरमध्ये नसल्याबाबत त्यांची मतं मांडली. हरकती नोंदवल्या. कुठे काय चुकलं, याची माहिती दिली. यावेळी अभ्यासकांनी त्यांच्यासमोर काही बाबी आणल्या. काही त्रुटींबाबत त्यांना माहिती दिली. जरांगे पाटील सरकारचे प्रतिनिधींशी बोलण्यापूर्वी या सर्व बाबी त्यांच्यासमोर मांडण्याची शक्यता आहे.
राजकीय अजेंडा आणू नका
अभ्यासकांनी केवळ समजासाठी यावं, राजकीय अजेंडा म्हणून येऊ नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. आज अनेक अभ्यासक अंतरवाली सराटीत दाखल झाले. त्यांनी त्यांची मतं मांडली. या बैठकीला स्त्री आणि पुरुषांची मोठी गर्दी उसळली आहे. आजच्या बैठकीनंतर जरांगे पाटील काय भूमिका मांडतात हे समोर येईल. त्याकडे सरकारचेच नाही तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. प्रकृती ठिक नसल्याने दौरा अर्धवट सोडल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिली. तब्येत ठिक असेल तर विदर्भ, उर्वरीत पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. 29 ऑगस्टपूर्वी जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात आणि काय अपेक्षा व्यक्त करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
