‘राजकीय भूमिकेमुळेच फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध; उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊन केला तर काय कराल?’

| Updated on: Apr 11, 2021 | 11:05 AM

निवडणुका आणि राजकारणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. | Lockdown Sanjay Raut

राजकीय भूमिकेमुळेच फडणवीसांचा लॉकडाऊनला विरोध; उद्या मोदींनीच देशव्यापी लॉकडाऊन केला तर काय कराल?
संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास देवेंद्र फडणवीस यांचा असलेला विरोध हा भाजपच्या राजकीय भूमिकेमुळे आहे, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमुळे सध्या केंद्र सरकार स्वत:च्या पक्षाचा स्वार्थ पाहत आहे. मात्र, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काय करणार? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशभरात लॉकडाऊन करा, असं फडणवीस मोदींना सांगतील का, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी विचारला. (Shivsena MP Sanjay Raut take a dig at Modi govt over Coronavirus situation and Lockdown)

ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील कोरोना परिस्थितीचं पुरेसं गांभीर्य नसल्याची टीका केली. सध्या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करावा लागेल का, याचा विचार झाला पाहिजे. मात्र, केंद्र सरकार प्रत्येकवेळी आपल्या पक्षाचा स्वार्थ पाहून निर्णय घेते. तुमचे लोक प्रचार करत आहेत किंवा निवडणुका आहेत म्हणून माणसं मारता येणार नाही. निवडणुका आणि राजकारणापेक्षा लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरु आहे. त्याठिकाणी कोरोना नाही, असे नव्हे. थोड्याच दिवसांत भयावह परिस्थिती समोर येईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

‘लॉकडाऊन नको तर मग लोकांचा जीव वाचवण्याचा पर्याय सांगा’

सर्वपक्षीय बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी लॉकडाऊन नको, अशी भूमिका मांडली. लोकांना लॉकडाऊन नको, असे त्यांनी सांगितले. हे अगदी योग्य आहे. मात्र, ही गोष्ट सरकारलाही माहिती आहे. पण मग लोकांचे जीव वाचवण्याचा दुसरा पर्याय फडणवीसांकडे आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

सध्याच्या घडीला जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचाच मार्ग वापरला जात आहे. तसेच जास्तीत जास्त लसी आणि रेमडेसिव्हिरचा साठा उपलब्ध करुन देणे, ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. पुण्यात भाजपचा महापौर असल्याने केंद्र सरकारने थेट तिकडे लसींचा साठा पाठवला. हा खोटारडेपणा झाला. पुण्याला लसी मिळत असतील तर मुंबईलाही मिळाल्या पाहिजेत. अन्यथा राजू शेट्टी यांनी म्हटल्याप्रमाणे सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीचा एक ट्रकही बाहेर पडू देणार नाही, ही भावना लोकांच्या मनात वाढीस लागेल, असे संजय राऊत यांनी म्हटले.

‘जीवनावश्यक औषधांचा गैरवापर करणे योग्य नव्हे’

लोकांच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या औषधांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होणे योग्य नाही. फक्त गुजरात तुमचा नाही तर संपूर्ण देश तुमचा आहे. तुमचे गुजरातवर अधिक प्रेम आहे, हे समजू शकतो. पण आपण देशाचे पंतप्रधान आहोत, ही गोष्ट नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवायला हवी, असे राऊत यांनी म्हटले. तसेच प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात बसून आम्हाला ज्ञानामृत वाटण्याची गरज नाही. त्यांनी मुंबई किंवा पुण्यात येऊन येथील परिस्थिती बघावी, असे संजय राऊत यांनी म्हटले.

हेही वाचा :

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांची भूमिका

… तर कोरोनावर महिन्याभरात नियंत्रण मिळवू शकू: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(Shivsena MP Sanjay Raut take a dig at Modi govt over Coronavirus situation and Lockdown)