…तर राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मुख्यमंत्री होऊ नये, या संकेताचे पालन होईल : फडणवीस

| Updated on: May 01, 2020 | 10:15 AM

केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करुन तात्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे (Devendra Fadnavis welcomes Governor Decision about Vidhan Parishad Election)

...तर राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मुख्यमंत्री होऊ नये, या संकेताचे पालन होईल : फडणवीस
Follow us on

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. निवडणूक आयोगाला शिफारस करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयामुळे राज्यातली अस्थिरता टळेल, असं म्हणत, राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, हा संकेत पाळला जाईल, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. (Devendra Fadnavis welcomes Governor Decision about Vidhan Parishad Election)

‘कोरोना संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो.’ असं ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

संविधानाच्या तत्वांचे पालन करतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारसीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करुन तात्काळ विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

राज्यपाल नियुक्त सदस्यांनी मंत्री किंवा मुख्यमंत्री होऊ नये, या संकेतांचेसुद्धा पालन होईल. मुख्यमंत्र्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला फडणवीसांनी मारला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ही भेट झाली. यावेळी दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र ते मुख्यमंत्र्यांचा मोदींना फोन, महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?

केंद्रीय निवडणूक आयोग सकाळी 11 वाजता बैठक घेणार आहे. राज्यपालांच्या विनंतीनंतर विधानपरिषदेच्या 9 जागांच्या निवडणुकीसाठी ही बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा अजूनही अमेरिकेतच असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. निवडणुकीसाठी 21 दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने आज-उद्याच तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : शिवसेनेचं राज्यपालांना, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र, रिक्त जागांच्या निवडणुकीची मागणी

24 एप्रिलला विधानपरिषदेचे 8 सदस्य निवृत्त होत आहेत, तर एक जागा 24 एप्रिलपूर्वीपासूनच रिक्त आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या 9 जागांवर निवडणूक अपेक्षित आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचे प्रत्येकी 3 सदस्य 24 एप्रिलला निवृत्त होत आहेत, तर शिवसेना आणि काँग्रेसचा प्रत्येकी 1 सदस्य निवृत्त होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सदस्य होण्याची संधी आहे. 27 मे पूर्वी उद्धव ठाकरेंना विधिमंडळाच्या कोणत्याही एका सदनाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. (Devendra Fadnavis welcomes Governor Decision about Vidhan Parishad Election)