काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गटबाजी, दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत घमासान, कोण कुणाच्या बाजूने?

| Updated on: Aug 25, 2020 | 12:18 AM

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन झालेल्या मतभेदानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण तापलंय (Dispute in Congress leadership over president).

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरुन गटबाजी, दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत घमासान, कोण कुणाच्या बाजूने?
Follow us on

नवी दिल्ली : काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार असं वाटत होतं. मात्र तूर्तास 4 ते 5 महिने सोनिया गांधीच हंगामी अध्यक्ष राहणार असल्याचा निर्णय झालाय. पण काँग्रेसची कार्यकारणी बैठक मात्र वादळी झाली. कारण 23 नेत्यांनी लिहिलेल्या पत्रावरुन काँग्रेस नेतृत्वानं नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर पत्रातून सोनिया गांधींच्या नेतृत्वावर सवाल उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्रातही काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण तापलंय (Dispute in Congress leadership over president).

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पत्र लिहिणारे नेते टार्गेटवर आल्याचीही जोरदार चर्चा आहे. कपिल सिब्बल, गुलाम नबी आझाद इत्यादी नेत्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. आधी पत्र लिहिणाऱ्या नेत्यांची भाजपसोबत हातमिळवणी असल्याचा आरोप झाला. यावरुन बैठकीत गुलाम नबी आझाद चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. कपिल सिब्बल यांचंही ट्विट चांगलंच गाजलं. मात्र, नंतर राहुल गांधी यांनी व्यक्तिगत फोन करुन आपण असं कोणतंही विधान केलं नसल्याचं सांगितल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनीही भाजपसोबत हातमिळवणीच्या आरोपांवर आक्रमक होत आरोप सिद्ध झाला तर राजीनामा देऊ असं म्हणत उत्तर दिलं.

CWC Meeting | भाजपसोबत हातमिळवणीचे आरोप, राहुल गांधींवर भडकलेले कपिल सिब्बल पुन्हा शांत

काँग्रेसच्या कार्यकारिणीची आज (24 ऑगस्ट) बैठक झाली. यात काँग्रसच्या अध्यक्षपदासंदर्भातही चर्चा झाली. मात्र, आज अध्यक्षपदापेक्षा राहुल गांधींच्या वक्तव्यामुळं झालेल्या घमासानाचीच चर्चा अधिक रंगली. काँग्रेस पक्षाच्या पुनर्रचनेबाबात 23 नेत्यांनी पत्र लिहिल्यावर कार्यकारिणीची बैठक झाली. मात्र त्या पत्रावरुन सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

भाजपशी हातमिळवणी करुन 23 नेत्यांनी पत्र लिहिलं. इच्छा नसतानाही सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्वीकारलं. त्या रुग्णालयात असताना प्रश्न उपस्थित करणं किती योग्य? असा प्रश्न राहुल गांधींनी विचारल्याचीही चर्चा झाली. मात्र, काँग्रेसकडून हे फेटाळण्यात आलं. राहुल गांधींच्या याच कथित वक्तव्यावर कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन नाराजी व्यक्त केली.

पक्षाचे अध्यक्ष कोण व्हावं? काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर म्हणतात….

सिब्बल यांनी म्हटलं, “राहुल गांधी म्हणतात, ‘आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली’. मी राजस्थान उच्च न्यायालयात काँग्रेसची मजबूत बाजू मांडली, मणिपूरमध्ये भाजपला सत्तेतून खाली खेचलं, पक्षाला वाचवलं. गेल्या 30 वर्षात मी भाजपच्या बाजूनं एकही असं वक्तव्य केलं नाही, ज्यामुळं भाजपला फायदा होईल. तरीही आम्ही भाजपसोबत हातमिळवणी केली, असं म्हटलं जात आहे.”

असं असलं तरी नंतर कपिल सिब्बल यांनी आपलं ते ट्विट डिलिट केलं. राहुल गांधी यांनी व्यक्तिगत फोन करुन आपण असं कोणतंही विधान केलं नसल्याचं सांगितल्याची माहिती कपिल सिब्बल यांनी दिली. तसेच आपण आपलं आधीचं ट्विट डिलिट करत आहोत, असं नमूद केलं.

कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ गुलाम नबी आझादही राहुल गांधींवर नाराज झाल्याचं सांगितलं जात आहे. जर कुठल्याही प्रकारे माझा भाजपशी संबंध सिद्ध झाला, तर मी राजीनामा देऊन काँग्रेसच्या सर्व पदांचा त्याग करेन, असं थेट आव्हानच आझाद यांनी दिलंय. मात्र, नंतर आझाद यांनी आपण ही नाराजी काँग्रेस कार्यकारणीबाहेरील आरोप करणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर व्यक्त केल्याचं स्पष्ट केलं.

काँग्रेस नेत्यांनी भाजपला हाताशी धरुन पत्र लिहिल्याचे राहुल गांधी म्हणालेच नाहीत : गुलाम नबी आझाद

काँग्रेसच्या एकूण 23 नेत्यांनी पक्षाच्या पुनर्रचनेबाबत सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. या पत्रात काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा. सध्या पक्षाला अशा नेतृत्त्वाची गरज आहे जो पूर्णवेळ पक्षाला देऊ शकेल. त्याने लोकांना भेटावे, कोणताही विषय असेल तर त्या अध्यक्षासोबत चर्चा करत येऊ शकेल आणि पक्ष संघटनेला वेळ द्यावा. भाजपचा वाढता विस्तार आणि तरुणांनी मोदींना दिलेली साथ या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचा जनाधार कमी होत आहे. त्यामुळे तातडीनं तळापासून मोठ्या बदलांची आवश्यकता आहे, अशी भूमिका त्या पत्रात व्यक्त करण्यात आली होती.

महाराष्ट्राचाच विचार केला तर या पत्रानंतर 2 गट पडल्याचं दिसून आलं. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकुल वासनिक सामूहिक नेतृत्वाच्या बाजूनं आहेत. तर बाळासाहेब थोरात, सुनिल केदार, संजय निरुपम, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार आणि राजीव सातव यांनी गांधी घरातील नेतृत्वाचा आग्रह धरलाय. पत्र लिहिणाऱ्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा आणि मुकुल वासनिकांचाही समावेश आहे.

यानंतर सुनिल केदारांनी गांधी कुटुंबाच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करणाऱ्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. यावेळी केदार यांनी सोनिया गांधीच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणाऱ्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही, असाही इशारा दिला. नेत्यांचं पत्र लिहिणं म्हणजे सोनिया गांधी अध्यक्ष नको, असाच अर्थ होतो. कारण तब्येतीमुळं त्या पक्षाला वेळ देऊ शकत नाही. मात्र गांधी कुटुंबातील नेतृत्वावरुन काँग्रेसमध्ये उघडपणे 2 गट आहेत, हे सिद्ध झालंय.

संबंधित बातम्या :

पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरांनी प्रश्न उपस्थित करणे लज्जास्पद, सुनील केदार यांचा हल्लाबोल

अध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधींनी जर सांगितलं, तर महाराष्ट्रातील सत्ता सोडू : विजय वडेट्टीवार

सुनील केदारांचे ट्विट स्वभावाप्रमाणे, राहुल गांधींनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे ही सर्वांची इच्छा : माणिकराव ठाकरे

संबंधित व्हिडीओ :


Dispute in Congress leadership over president