Vedanta Project : राज्यात डबल इंजिनचे सरकार अन् फायदा गुजरातला, चव्हाणांनी सांगितली वेदांता प्रकल्पाच्या पडद्यामागची गोष्ट

वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार होता. शिवाय याबाबत सर्व प्रक्रियाही पूर्ण झाली होती. राज्यात सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातला कसा गेला असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वीज, पाणी हे कमी दराने देत 34 हजार कोटींची सवलत देण्याचे ठरवले होते. एवढेच नाहीतर केंद्रानेही सवलती देण्याचे ठरवले होते.

Vedanta Project : राज्यात डबल इंजिनचे सरकार अन् फायदा गुजरातला, चव्हाणांनी सांगितली वेदांता प्रकल्पाच्या पडद्यामागची गोष्ट
पृथ्वीराज चव्हाण
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2022 | 4:41 PM

कराड :  (Vedanta Project) वेदांता प्रकल्प हा गुजरातला गेल्याने आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या एका प्रकल्पावरुन आता मागील सर्वच प्रकल्पाबाबत नेमके काय झाले होते, याचा उहापोह सुरु झाला आहे. हा महत्वाचा प्रकल्प (Gujrat) गुजरातला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते (Prithviraj Chavan) पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आले अन् गुजरातला फायदा होण्यास सुरवात झाल्याचेही चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यामुळे केवळ राज्य सरकारच नाहीतर केंद्रावरुन हलचाली झाल्यानेच हा महत्वाचा प्रकल्प गुजरातला हलवला गेल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील सवाल उपस्थित केला आहे.

सर्व काही निश्चित होऊनही प्रकल्पाचे गौडबंगाल काय?

वेदांता हा प्रकल्प महाराष्ट्रातच होणार होता. शिवाय याबाबत सर्व प्रक्रियाही पूर्ण झाली होती. राज्यात सत्तांतर होताच हा प्रकल्प गुजरातला कसा गेला असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पासाठी वीज, पाणी हे कमी दराने देत 34 हजार कोटींची सवलत देण्याचे ठरवले होते. एवढेच नाहीतर केंद्रानेही सवलती देण्याचे ठरवले होते. प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच केंद्रातून चक्रे फिरली आणि महाराष्ट्रातला प्रकल्प थेट गुजरातला गेल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

थेट पंतप्रधानांचा हस्तक्षेप..!

आतापर्यंत राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळे हा वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. पण परदेश गुंतवणूक आणि परदेशी प्रकल्पाबाबत अधिकची माहिती असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र, या प्रकल्पात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप केल्यानेच हा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. शिवाय या प्रकल्पाच्या स्पर्धेत गुजरात राज्य नव्हतेही. त्यामुळे अधिक रोष व्यक्त केला जात आहे.

बुलेट ट्रेन केवळ मोदींच्या हट्टासाठीच

वेदांता प्रकल्पावरुन आता इतर प्रकल्पांचेही काय होत आहे हे देखील समोर आणले जात आहे. बुलेट ट्रेनची आवश्यकताच काय असा सवाल मध्यंतरी मनसेनेही उपस्थित केला होता. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी तर गंभीर आरोप केला आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हट्टापायी हा प्रकल्प झाला आहे. मुंबई येथे बुलेट ट्रेनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारणे गरजेचे होते पण याकडेही दुर्लक्ष करीत बुलेट ट्रेन गुजरातलाच नेण्यात आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.