आधी गुलाबराव म्हणाले मुलगा मानलं असतं तर वाईट वेळ आली नसती, आता खडसेंचं रोखठोक उत्तर

| Updated on: Jan 28, 2020 | 6:45 PM

मी आजपर्यंत एकही निवडणूक हरलो नाही. पण मी ज्यांना राजकारण शिकवलं, मोठं केलं त्यांनीच गद्दारी केली, असा आरोप माजी महसूलमंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे (Eknath Khadse on Gulabrao Patil).

आधी गुलाबराव म्हणाले मुलगा मानलं असतं तर वाईट वेळ आली नसती, आता खडसेंचं रोखठोक उत्तर
Follow us on

जळगाव : मी आजपर्यंत एकही निवडणूक हरलो नाही. पण मी ज्यांना राजकारण शिकवलं, मोठं केलं त्यांनीच गद्दारी केली, असा आरोप माजी महसूलमंत्री आणि भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे (Eknath Khadse on Gulabrao Patil). एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर थेट निशाणा साधत मी वडिलांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम केलं, मात्र ते मुलाप्रमाणं वागले, नाही. त्यांनी मुलाप्रमाणे वागायला हवं होतं, असंही म्हटलं.

एकनाथ खडसे म्हणाले, “मी राजकीय जीवनात आहे. माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात एकही निवडणूक हरलो नाही. सहकारी क्षेत्र असेल, कृषी बाजार समिती, आमदारकी अशा अनेक निवडणुकांना मी उभा राहिलो. यातील कोणतीही निवडणूक मी हरलो नाही. कार्यकर्त्यांमुळेच मी हरलो नाही. कार्यकर्त्यांची मेहनत आणि परिश्रम त्यात होती. म्हणूनच आजपर्यंत हरलो नाही. मात्र, असाही अनुभव आहे की काहीवेळा आपण आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना शुन्यातून वर आणण्याचा प्रयत्न करतो. असेच कार्यकर्ते कधीकधी नाराज होऊन धोका देतात.”

मी मोजक्या कार्यकर्त्यांना मोठं केलं, वाढवलं, विस्तार केला, त्यांचं शुन्यातून विश्व निर्माण केलं. अशाच काही कार्यकर्त्यांमधील 5-6 लोकांनी गद्दारी केली. त्यामुळे अशा कार्यकर्त्यांची डीएनए टेस्ट करायला हवी होती, असं गुलाबराव यांना वाटू शकतं, असंही एकनाथ खडसे यांनी नमूद केलं.

एकनाथ खडसेंनी प्रेम केलं, मात्र मुलगा मानलं नाही. म्हणूनच अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं, असा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला होता. यावर बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, “गुलाबराव पाटील आमदार व्हावेत म्हणून पूर्वी ते जिल्हा परिषदेचे सभापती असल्यापासून मी त्यांनी पुढचा आमदार म्हणून त्यांना पुढं आणलं. त्यावेळी त्यांच्या माध्यमातून अनेक कामं करुन घेतली. त्यामुळे त्यांना निवडणुकीत मदत झाली. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या मदतीने विकासासाठी चांगले प्रयत्न केले.”

आता गुलाबराव म्हणतात खडसेंनी वडिलांप्रमाणे प्रेम केलं, पण मुलगा म्हणून वागवलं नाही. वडिलकीच्या नात्याने जिल्ह्यातील प्रत्येक आमदाराला मी प्रेम केलं. यामध्ये पक्षाचाही प्रश्न असतो. आमचे पक्ष वेगवेगळे आहेत. पक्षाच्या धोरणानुसार, निर्णयानुसार वागावं लागतं. शिवसेना भाजप जेव्हा एकत्र होते, तेव्हा आम्ही एकत्र काम केलं. नंतर दोन्ही पक्ष वेगळे झाले. तरिही मी जर वडिलकीच्या नात्याने प्रेम केलं असं ते म्हणतात, तर मुलाने मुलासारखं वागलं पाहिजे, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांना टोला लगावला.

संबंधित बातम्या :

नाथाभाऊंनी मला मुलगा मानलं असतं, तर वाईट वेळ आली नसती : गुलाबराव पाटील

मी भाजपवर नाराज नाही, माझी नाराजी फडणवीस टीमवर : एकनाथ खडसे

नाराजी दूर झाली का? खडसे म्हणतात, त्याची चर्चाच झाली नाही!