मविआचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला : एकनाथ खडसे

| Updated on: Dec 02, 2020 | 6:51 PM

महाविकास आघाडी सरकारवर तीन पक्षांची रिक्षा अशी टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. (Eknath Khadse)

मविआचं सरकार तीन पक्षांची रिक्षा म्हणता, वाजपेंयींनी तर एनडीएचा महाट्रक चालवलेला : एकनाथ खडसे
Follow us on

जळगाव : महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार रिक्षा म्हणून भाजपचे नेते टीका करतात. मग, अटलजींनी तर एनडीएचा महाट्रक चालवला होता. त्यांनी अनेकांचे सरकार सांभाळले होते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले. भाजप मी सोडली नाही तर मला भाजपने बाहेर ढकलले. मागच्या काळात माझा अपमान झाला, डावलले गेले, मला पक्ष सोडायला भाग पाडले, असा आरोप एकनाथ खडसेंनी केला. भाजप त्यांचे आमदार सांभाळण्यासाठी  सरकार पडणार असल्याचे दावे करण्याचे उद्योग करत आहे. मी तिकडे असताना हे उद्योग केले आहेत, आमदार सांभाळण्यासाठी ते करावेच लागते. लाल दिव्याच्या गाड्या 50 आणि आश्वासने 200 अशी ही परिस्थिती आहे, असा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. (Eknath Khadse criticise BJP  at Jalgaon in NCP meeting )

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचे आभार मानले आहेत. अनेकांनी मला विचारणा का केली, की तुम्ही राष्ट्रवादी का निवडली? बहुजन समाजाला न्याय देण्याचं काम शरद पवार यांनी केलं म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास लिहिता येणार नाही. पवार इज पॉवर. पवारांनी मुख्यमंत्री असताना मैलाचे दगड व्हावे, असे निर्णय घेतले. माझे पहिले मुख्यमंत्री म्हणून मी 90 मध्ये त्यांच्यासोबत काम केले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण देण्याचे काम पवारांनी केले. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून पवारांनी चांगले निर्णय घेतले. पवारांच्या उत्तम कामगिरीचे अनेक पैलू सांगता येतील, असं एकनाथ खडसे म्हणाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय बैठकीत बोलत होते.

शरद पवारांनी अशक्य गोष्ट शक्य केली

राज्यात महाविकास आघाडी सरकार आणण्याचे काम शरद पवारांनी केले. हे कधीही न होण्यासारखे काम होते. ते पवारांनी शक्य केले. भाजपला बाजूला ठेऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. सरकार पडेल ही भाजपची भूमिका, पण वर्ष झाले अजून काहीही घडलेले नाही. सत्तेत येण्यासाठी भाजपला एका पक्षाचे पूर्ण समर्थन हवे आहे. एखादा पक्ष तिकडे गेल्याशिवाय भाजपचे सरकार येऊच शकत नाही. उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री पदावर काम करतील का? मग शिवसेना तिकडे जाणारच नाही. काँग्रेस उभ्या हयातीत भाजपसोबत जाऊ शकत नाही. राष्ट्रवादीचा विषयच नाही. एकदा भाजपने प्रयत्न केला. पण काय झाले? याचा त्यांना चांगला अनुभव असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावला. (Eknath Khadse criticise BJP  at Jalgaon in NCP meeting )

सरकार पडणार नाही

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चिंता करू नका सरकार पडणार नाही, असे सांगितले.अहंमपणा ज्याठिकाणी येतो त्याठिकाणी पक्षाचे वाटोळे होते. नेतेमंडळी जास्त, कार्यकर्ते कमी तर पक्ष वाढीला मर्यादा येतात. संघटितपणे काम केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही, मग नाथाभाऊ पण काहीही करू शकणार नाही. अनावधानाने चूक झाली तर दुर्लक्ष करा. झोकून देऊन काम करा. पक्ष निश्चित वाढेल. पैसा गौण आहे. कार्यकर्ते उभे करा, आपोआप पक्ष संघटन बळकट होईल. या माध्यमातून आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. सरकार आपले आहे, सरकारची कामे लोकांपर्यंत पोहचवा, या पद्धतीने आपल्याला पुढे काम करायचं असल्याचं खडसेंनी सप्षट केले.

आकस बुद्धीनं काम करु नका

बीएचआर गैरव्यवहार प्रकरण तत्कालीन सरकारने दडपले. आता आधीच्या सूचनेनुसार कारवाई होत आहे. नव्याने काहीही झालेले नाही. हे प्रकरण गोरगरिबांशी निगडित आहे. यात गोरगरिबांना न्याय मिळाला तर ते राष्ट्रवादी काँग्रेसची साथ आयुष्यभर सोडणार नाहीत. म्हणून हे गृहीत धरून काम करायचे आहे. मात्र, आकस बुद्धीने काम करू नका, असा सल्ला देखील एकनाथ खडसेंनी दिला.

शरद पवार यांचा वाढदिवस येत आहे. हा वाढदिवस इतक्या उत्साहात साजरा करा की विरोधक पाहत राहिले पाहिजे. जिकडे पाहावं तिकडे शरद पवार असे चित्र निर्माण करूया. ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तो पक्ष पुढे जातो. असे कार्यक्रम पक्ष वाढीसाठी निमित्त असतात. कोणत्याही प्रकारची गोष्ट असेल तर तिचा फायदा उचला. नेत्यांचा वाढदिवस आम्ही याच पद्धतीने साजरे केले. सरकारच्या चांगल्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचवा. त्याने खूप फरक पडतो. याच पद्धतीने काम करूया. मला रुळायला फार वेळ लागत नाही. माझा छळ झाला आहे, हेच फक्त माझ्या लक्षात आहे. माझा तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. तळागाळातील कार्यकर्ते आपल्याकडे कमी आहेत, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खडसेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. (Eknath Khadse criticise BJP  at Jalgaon in NCP meeting )

संबंधित बातम्या

पक्ष सोडताना दिल्लीवरुन फोन, पक्ष का सोडता अशी विचारणा : एकनाथ खडसे

बीएचआर बँक घोटाळ्यात बड्या नेत्यांची नावे, यादी तयार, दोन दिवसांत गुन्हा दाखल होणार; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

पवार साहेबांनी मला आमदार करायचं ठरवलं तर तुमच्या मतदानाची गरज पडणार नाही; खडसेंचा भाजपला टोला

(Eknath Khadse criticise BJP  at Jalgaon in NCP meeting )