राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे एक नवचैतन्य निर्माण होईल: एकनाथ खडसे

| Updated on: Feb 05, 2021 | 7:19 AM

राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. | Eknath Khadse On NCp Sanvad yatra

राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे एक नवचैतन्य निर्माण होईल: एकनाथ खडसे
Sharad pawar And Eknath Khadse
Follow us on

जळगाव :  विधानपरिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपल्या विस्तारासाठी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरु केली आहे. या यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवा ब्रिगेड संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. ही यात्रा आता खान्देशात पोहोचणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण होईल, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. (Eknath Khadse On NCp Sanvad yatra)

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर संवाद यात्रा सुरु आहे. या यात्रेच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचं काम सुरु आहे. विदर्भाचा दौरा आटपून ही यात्रा खान्देशात येत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला संवाद यात्रा येणार आहे. याच पार्श्वभूमीवर जळगावातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते कामाला लागलेत.

राष्ट्रवादीच्या संवाद यात्रेचं 11 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन होईल. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद तर साधलाच जाणार आहे पण अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही छोटेखानी सभांचं आयोजन केलं गेलं आहे. या यात्रेने कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी यांच्यात नवचैतन्य निर्माण होईल, असं एकनाथ खडसे म्हणाले.

काय आहे संवाद यात्रा?

राष्ट्रवादीच्या या परिवार संवाद यात्रेला 28 जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. या निमित्ताने 17 दिवस, 3 हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. 17 दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील 14 जिल्हे, 82 मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या 135 बैठका व 10 जाहीर सभा होणार आहेत.

यात्रा कशासाठी?

या परिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवण्यात येणार आहे. तसेच कार्यकर्त्यांना सक्षम करण्यासाठीही ही यात्रा काढण्यात येणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा नेत्यांचा पक्ष किंवा संस्थानिकांचा पक्ष असल्याचं एक चित्रं आहे. ही चौकट मोडून राष्ट्रवादीला कार्यकर्ता आणि जनतेचा पक्ष असल्याची इमेज निर्माण करायची आहे. पक्षाचं हे स्वरुप बदलण्यासाठी सुद्धा ही यात्रा आयोजित केली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

निमित्त यात्रेचं, मात्र पक्षप्रवेशांचा धडाका

राष्ट्रवादीने कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ही यात्रा काढली आहे. मात्र, प्रत्यक्षात कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच त्या त्या भागातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याचा धडाकाही राष्ट्रवादीने लावला आहे.

(Eknath Khadse On NCp Sanvad yatra)

हे ही वाचा :

‘सत्ताधाऱ्यांची जुमलेबाजी देशाला…’, पेट्रोल डिझेल दरवाढीवरुन सामनातून मोदी सरकारवर हल्लाबोल

धनंजय मुंडेंचा आधी शनी शिंगणापुरात अभिषेक, आता गहिनीनाथगड येथे महापुजा