सबुरी ठेवायची की श्रद्धा सबुरीचा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं, साई ठरवेल : एकनाथ खडसे

| Updated on: Nov 06, 2019 | 6:45 PM

मला पक्षात कितीही त्रास झाला, कितीही अवहेलना झाली तरी मी पक्षातच राहणार. कारण माझी पक्षावर नितांत श्रद्धा आहे, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse on bjp) यांनी केले.

सबुरी ठेवायची की श्रद्धा सबुरीचा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं, साई ठरवेल : एकनाथ खडसे
Follow us on

शिर्डी : मला पक्षात कितीही त्रास झाला, कितीही अवहेलना झाली तरी मी पक्षातच राहणार. कारण माझी पक्षावर नितांत श्रद्धा आहे, असे वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath khadse on bjp) यांनी केले. एकनाथ खडसे (Eknath khadse on bjp) यांनी आज (6 नोव्हेंबर) संपूर्ण कुटुंबासह शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर माध्यामांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

मी साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र जपतो आहे. मात्र अजून किती दिवस सबुरी ठेवायची? का संपूर्ण जीवनच सबुरी ठेवून काढायचं? की हा श्रद्धा सबुरीचा मंत्र तोडून मार्गक्रमण करायचं? याबाबतचे संकेत मला साईबाबा देतील आणि त्यानुसार माझी राजकीय वाटचाल राहील, असेही ते म्हणाले.

सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना खडसे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळाचा नेता म्हणून सर्वांची मान्यता आहे. फडणवीस हे सर्वात मोठ्या पक्ष्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेचे त्यास दुमत असू शकेल. त्यांची मागणी कोणत्या आधारावर हे शिवसेनाच सांगू शकेल. असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे परिस्थितीनुसार निर्णय घेतात. त्यांचे निर्णय कधी योग्य, तर कधी चुकीचे ठरले असतील. काँग्रेस राष्ट्रवादीला विरोधी पक्षात बसण्याचा जनतेचा कौल आहे. शरद पवार यांनी स्वत: आम्ही विरोधात बसणार असे सांगितले आहे. त्यामुळे दिलेल्या शब्दाप्रमाणे शरद पवार विरोधी पक्षातच राहतील अशी अपेक्षाही एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

सध्या भाजप-शिवसेनेत 50-50 पदाच्या फॉर्म्युल्यावरुन दरी निर्माण झाली आहे. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्तास्थापना खोळंबली आहे.

शिवसेना-भाजपमध्ये 50-50 च्या फॉर्म्युल्यावरुन फूट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आता 14 दिवस उलटले. मात्र, सत्ता स्थापनेचा पेच अद्यापही सुटलेला नाही. लहान भाऊ-मोठा भाऊ म्हणत ज्या भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे ही निवडणूक लढली, तेच आता मुख्यमंत्रिपदावर अडून बसले आहेत. त्यामुळे सत्ता स्थापना खोळंबली आहे. त्यातच आघाडीही सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 288 पैकी 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. त्यामुळे सत्ता स्थापन्यासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यावाच लागणार आहे.

शिवसेनेला आतापर्यंत 7 अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 56 वरुन 63 वर पोहचलं आहे, मात्र भाजपसोबत शिवसेनेचा अजूनही 36 चाच आकडा दिसत आहे.

भाजपला 12 अपक्षांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचं संख्याबळ 105 वरुन 117 जागांवर पोहोचलं आहे. भाजप-शिवसेना यांचं एकत्रित संख्याबळ 180 वर जातं. परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेच्या पाठीवर काँग्रेस ‘हात’ ठेवला आणि राष्ट्रवादीने ‘वेळ’ साधली, तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.