Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या भोवतीची चौकडी कोणती? ज्यामुळे ते संपर्कहीन झाल्याचा बंडखोर आमदारांचा आरोप, वाचा सविस्तर

| Updated on: Jun 28, 2022 | 1:10 PM

Uddhav Thackeray : बंडखोर आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी रोष आहे. नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांचे पीए आहेत. त्यांचे अत्यंत विश्वासू आहेत. उद्धव ठाकरेंच्या सर्व मिटिंगा तेच ठरवतात.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या भोवतीची चौकडी कोणती? ज्यामुळे ते संपर्कहीन झाल्याचा बंडखोर आमदारांचा आरोप, वाचा सविस्तर
उद्धव ठाकरेंच्या भोवतीची चौकडी कोणती? ज्यामुळे ते संपर्कहीन झाल्याचा बंडखोर आमदारांचा आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर अनेक अफवा उठल्या होत्या. या बंडामागे भाजप असल्याचं सांगितलं जात होतं. अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते शरद पवारांपर्यंत सर्वांनीच तसा आरोप केला आहे. तर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आणि भाजपसोबत (bjp) युती व्हावी म्हणून आम्ही बंड करत असल्याचं बंडखोरांनी म्हटलं होतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती नकोच असंही या बंडखोरांनी म्हटलं होतं. तर शंभुराज देसाई यांनी तर मी सत्तेत असूनही फायदा नव्हता. मी नामधारी मंत्री होतो, अशी खदखद व्यक्त केली. काही आमदारांनी तर उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्या भोवती असलेल्या चांडाळ चौकडीमुळेच आण्ही बंड करत असल्याचं सांगून खळबळ उडवून दिली. जे कधीही लोकांमधून निवडून आले नाहीत, ते आम्हाला उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देतच नव्हते. त्यांना अनेक फोन करावा लागायचे. अनेकदा तर ते फोनही उचलत नव्हते. त्यामुळे एकच खळबल उडाली होती. या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांभोवतीच्या चौकडीवर चर्चा सुरू झाली आहे.

मिलिंद नार्वेकर

बंडखोर आमदारांमध्ये मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी रोष आहे. नार्वेकर हे शिवसेनेचे सचिव आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांचे पीए आहेत. त्यांचे अत्यंत विश्वासू आहेत. उद्धव ठाकरेंच्या सर्व बैठका तेच ठरवतात. कुणाला उद्धव ठाकरेंना भेटायला द्यायचे आणि कुणाला नाही हे तेच ठरवत असतात. त्यामुळे मर्जीतील लोकांनाच नार्वेकरांकडून प्रवेश दिला जात असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचता येत नसल्याचंही या आमदारांचं म्हणणं आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडताना सर्व रोष मिलिंद नार्वेकरांवर व्यक्त केला होता. तर राज ठाकरे यांनीही पक्ष सोडताना बडव्यांचा उल्लेख केला होता.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये सर्वाधिक रोष संजय राऊत यांच्यावर आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या सांगण्यानुसारच चालत आहेत. राष्ट्रवादीच्या दावणीला राऊतांनी शिवसेना बांधल्याचा त्यांचा आरोप आहे. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची अनैसर्गिक युती आहे, पण राऊतांनी ही अनैसर्गिक युती घडवून आणल्याचं त्यांचं मत आहे. शिवाय राऊत हे मीडियामध्ये ज्या पद्धतीने बोलतात ते शब्द जिव्हारी लागणारे असतात. जोडण्या ऐवजी तोडण्याची राऊतांची भाषा असते. त्यामुळे अडचणी वाढतात असं या आमदारांचं म्हणणं आहे. राऊत हे उद्धव ठाकरेंना चुकीचं मार्गदर्शन करत असल्याचाही आमदारांचा आरोप आहे. त्यांच्यामुळे मातोश्रीपर्यंत जाणं शक्य नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. राऊत हे शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार आहेत. तसेच ते दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक आहेत.

वरुण सरदेसाई

वरुण सरदेसाई हे युवा सेनेचे नेते आहेत. ते आदित्य ठाकरे यांचे नातेवाईक आहेत. शिवाय आदित्य यांच्या अत्यंत जवळचे आहेत. वरुण सरदेसाई हे अत्यंत कमी वेळात शिवसेनेत नेते म्हणून नावारुपाला आले. त्यांना थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा अॅक्सेस आहे. पण इतरांना तेवढ्या सहजपणे मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता आहे.

अनिल परब

अनिल परब हे मातोश्रीच्या अत्यंत जवळचे आहेत. मातोश्रीच्या परिसरातच राहतात. त्यामुळे ते कायम मातोश्रीवर असतात. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. शिवसेनेच्या अनेक निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग असतो. वकील असल्याने ते शिवसेनेची कायदेशीर बाजू सांभाळत असतात. त्यांच्यामुळेही मातोश्रीपर्यंत पोहोचता येत नसल्याची अनेकांची तक्रार आहे. त्यामुळे शिवसेनेत त्यांच्याविषयीही नाराजी आहे.