गोव्यात फडणवीसांच्या भूमिकेला रवी नाईकांचा खो, महाराष्ट्र गोमंतकला सोबत घेण्यास विरोध, काय घडतंय?

गोव्यातील निकालानंतर विजयाची प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही सांगितला. मात्र फडणवीसांच्या या भूमिकेच्या अगदी विरोधातील वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नव निर्वाचित आमदार रवी नाईक यांनी केलं आहे.

गोव्यात फडणवीसांच्या भूमिकेला रवी नाईकांचा खो, महाराष्ट्र गोमंतकला सोबत घेण्यास विरोध, काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेविरोधात रवी नाईक यांची प्रतिक्रिया
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 1:25 PM

पणजीः गोव्यात भारतीय जनता पार्टीला (Goa BJP) पूर्ण बहुमत मिळाले तरीही काही अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला (MGP) सोबत घेऊनच सरकार स्थापन करणार, असं आश्वासन काल भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. गोव्यातील निकालानंतर विजयाची प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही सांगितला. मात्र फडणवीसांच्या या भूमिकेच्या अगदी विरोधातील वक्तव्य गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नव निर्वाचित आमदार रवी नाईक यांनी केलं आहे. भाजपचे 20 आमदार आणि अपक्ष 3 असे आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे, आम्हाला कुणाची गरज नाही, असं वक्तव्य आज रवी नाईक यांनी केलंय. त्यामुळे महाराष्ट्र गोमंतक पक्षाला गोव्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळते की नाही, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रवी नाईक काय म्हणाले?

रवी नाईक हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे फोंडा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार आहेत.
गोव्यात आज आमदार रवी नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सत्ता स्थापनेवेळी आम्हाला इतर पक्षांची गरज नाही, असे सांगताना ते म्हणाले, ‘ भाजपचे 20 आमदार आणि अपक्ष 3 असे मिळून आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. अन्य कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही. आमदारांची बैठक बोलावली जाईल. मला वाटते डॉ. प्रमोद सावंत हेच मुख्यमंत्री होतील.

गोव्याचे मुख्यमंत्री कोण होणार?

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतच होतील, असं सूतोवाच रवी नाईक यांनी केलं. ते म्हणाले, ‘ डॉ. सावंत साहेबांनी मेहनत घेतली आहे. आणखीही आमचे नेते होते. राज्याबाहेरूनही आले होते. महाराष्ट्रातून आले होते. त्यांनीही काम केले आहे. त्यामुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे. गोव्यात फुलफ्लेज भारतीय जनता पक्ष असून आम्हीच सरकार स्थापन करणार, असा दावा रवी नाईक यांनी केला.

काँग्रेसच्या रिसॉर्ट पॉलिटिक्सची चर्चा

गोवा विधानसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेसच्या सर्व आमदारांना रिसॉर्टवर नेण्यात आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता निकाल लागल्यानंतरही काही आमदार भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यावर प्रतिक्रिया देताना रवी नाईक म्हणाले, काँग्रेसचे आमदार आमच्याकडे येणार याबाबत माझ्याकडे माहिती नाही. त्यांना त्यांच्या पक्षाने हॉटेलमध्ये लॉक करून ठेवले आहे.’

इतर बातम्या-

“प्रत्येकानं बघावा असा सिनेमा कारण…”, ‘द कश्मीर फाईल्स’ रिलीज झाल्यानंतर शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट

ज्येष्ठ साहित्यिक मदतीची याचना करताना आढळले; सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार