गल्ला जर खाल्ला, डल्ला जर मारला तर…गुलाबराव पाटील यांचा रोहित पवार यांना खोचक टोला

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ईडीच्या चौकशीवरून राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांना चांगलंच घेरलं आहे. तुम्ही काही खाल्लेलंच नसेल तर चिंता कशाला करता? चौकशी होऊन जाऊ द्या. दूध का दूध आणि पानी का पानी होऊ द्या, असं गुलाबराव पाटील म्हणाले. तसेच ममता बॅनर्जी या महाविकास आघाडीतून का पडल्या त्याचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं.

गल्ला जर खाल्ला, डल्ला जर मारला तर...गुलाबराव पाटील यांचा रोहित पवार यांना खोचक टोला
rohit pawar and gulabrao patil
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 25, 2024 | 6:40 PM

जळगाव, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी : शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते, आमदार रोहित पवार यांची काल ईडीकडून 12 तास चौकशी करण्यात आली आहे. पवार घराण्यातील पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीची एवढी दीर्घतास चौकशी झाली असेल. त्यामुळे राष्ट्रवादीच एकच खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांना पुन्हा 1 फेब्रुवारी रोजी चौकशीला बोलावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. रोहित पवार यांना दुसऱ्यांदा चौकशीला बोलावणं याचाच अर्थ काही तरी काळंबेरं असल्याचंही सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी रोहित पवार यांना डिवचलं आहे. गल्ला जर खाल्ला आहे, डल्ला जर मारला आहे, तर निश्चितच चौकशीला सामोरे जावे लागेल आणि दूध का दूध पानी का पानी, पानी हे सिद्ध करावे लागेल, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यांच्या ईडी चौकशीवरून सरकारवर टीका करणाऱ्यांना शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. ईडीच्या चौकशीचा आणि सरकारचा काहीच संबंध नाही. या चौकश्या सरकार करत नाही. ईडी ही एक स्वतंत्र एजन्सी आहे. तुम्ही जर निष्कलंक असाल तर काहीच होणार नाही. पण तुम्ही जर कलंकित असाल तर कारवाई होणारच. पण गल्ला जर खाल्ला असेल, डल्ला जर मारला असेल तर निश्चितच चौकशीला सामोरे जावे लागेल. या चौकशीत दूध का दूध आणि पानी का पानी सिद्ध करावं लागेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

असं काही करू नका

यावेळी गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांनाही आवाहन केलंय. मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ तुमच्या बाजूने आहेत. त्यामुळे नाहक आपलेच भाऊ अडचणीत येतील. मुंबईत त्रास होईल असं काही करू नका, असं कळकळीचं आवाहन पाटील यांनी केलं.

अनेक नेते येतील

डॉ.उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांचे तिकडे चित्त लागत नाही. कारण सगळीकडे भगवामय वातावरण झालं आहे. देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि गाव पातळीवर सगळीकडे हेच वातावरण आहे. म्हणूनच उल्हास पाटील भाजपमध्ये आले. जळगाव जिल्ह्यात आता ही सुरुवात झाली आहे. मात्र पुढील काळात जळगाव जिल्ह्यातील बडे बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेमध्ये येतील, असा दावा त्यांनी केला.

म्हणून ममता बॅनर्जी बाहेर

ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत. त्यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देश आता मोदीमय झाला आहे. देशाचं वातावरण मोदींच्या बाजूने आहे. हवामानाचा अंदाज प्रत्येकाला कळत असतो. त्यामुळे इंडिया आघाडीत राहून अपयशाचं खापर आपल्या अंगावर घ्यावं असं कुणाला वाटेल? इंडिया आघाडीतून बरेच लोक बाहेर पडतील. पराभव यांच्यामुळे झाला हे कोणाला ही स्वीकारायचं नाहीये, त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी हा पावित्रा घेतला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us