नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा दांडगा जनसंपर्क विरुद्ध समीर भुजबळ

| Updated on: Jul 05, 2019 | 4:16 PM

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमधून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तिकीट जाहीर केलंय. युतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नसला तरी शिवसेनेच्या खासदार हेमंत गोडसे यांनाच शिवसेनेचं तिकीट निश्चित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघात 2009 नंतर पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध गोडसे असा सामना बघायला मिळणार आहे. यंदा मात्र या […]

नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा दांडगा जनसंपर्क विरुद्ध समीर भुजबळ
Follow us on

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकमधून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तिकीट जाहीर केलंय. युतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नसला तरी शिवसेनेच्या खासदार हेमंत गोडसे यांनाच शिवसेनेचं तिकीट निश्चित असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदार संघात 2009 नंतर पुन्हा एकदा भुजबळ विरुद्ध गोडसे असा सामना बघायला मिळणार आहे. यंदा मात्र या दुरंगी सामन्यात अपक्ष आणि वंचित आघाडीचा देखिल तडका असल्याने कोणाला याचा फायदा होणार आणि कोणाला नुकसान होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादीकडून प्रचाराला सुरुवात

अपेक्षेनुसार समीर भुजबळ यांना पक्षाने तिकीट दिलं असलं तरी त्यांना शिवसेनेच्या विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचं तगडं आव्हान असेल. विशेष म्हणजे 2009 साली ज्या समीर भुजबळ यांनी मनसेत असलेल्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता, त्याच हेमंत गोडसे यांनी 2014 साली शिवसेनेत प्रवेश करत छगन भुजबळांचा मोठ्या फरकाने पराभव केला. हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा पराभव केल्यानंतर सत्तांतर झालं आणि त्यानंतर जवळपास दोन वर्ष भुजबळ काका-पुतणे तुरुंगात असल्याने राष्ट्रवादीची नाशिक जिल्ह्यात दैना झाली. मात्र तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ यांनी आपल्या दौऱ्यांचा झंजावात सुरु केला आणि जिल्हा पुन्हा एकदा पिंजून काढला. पाच वर्षात विकास थांबला होता, आता मात्र विकासाला पुन्हा गती देणार, असं सांगत भुजबळांनी काल समीर भुजबळांच्या प्रचाराचा अनौपचारिक नारळ फोडला.

समीर भुजबळांसाठी मार्ग खडतर

छगन भुजबळ यांनी आपल्या पुतण्यासाठी रणशिंग फुंकलं असलं तरी प्रत्यक्ष समीर भुजबळांना मात्र पक्षांतर्गत होणारा विरोध लपून राहिलेला नाही. पक्षातीलच एक गट मधल्या काळात थेट शरद पवारांना भेटून समीरला उमेदवारी दिल्यास काम करणार नाही असं सांगून आला आहे. मात्र पवारांनी नाशिकच्या तिकिटाचा निर्णय सर्वस्वी भुजबळच घेतील असं स्पष्ट केल्याने अनेकांचा हिरमोड देखिल झाला. मात्र काकांच्या पुण्याईवर निवडणूक जिंकणं समीर भुजबळ यांच्यासाठी सोपं नसेल, असं राजकिय विश्लेषक सांगतात. भुजबळांबद्दल एकवेळ सहानुभूती असली तरी समीर भुजबळांना मात्र नाशिककरांशी नाळ जोडावी लागणार असल्याचं जाणकारांचं मत आहे.

हेमंत गोडसेंसाठी जमेच्या बाजू कोणत्या?

एकीकडे हेमंत गोडसे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, त्यांनी केलेली कामं आणि सर्वसामान्यांमधे असलेली त्यांची उठबस यामुळे तळागाळात त्यांचं नेटवर्क पक्क आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात एकदा निवडून दिलेला खासदार पुन्हा निवडून येत नाही असा इतिहास आहे. मात्र पाच वर्षात कोणत्याही वादात न अडकणं, पक्षांतर्गत कुरबुरीला वेळेवरच निस्तरणं, कायमच सर्वसामान्यांशी नाळ जोडून ठेवणं, सर्वसामान्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांना जातीने हजेरी लावणं आणि कायमच एक सुसंस्कृत आणि विनयशील नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करणं ही हेमंत गोडसे यांच्या जमेची बाजू असल्याने नाशिकचा इतिहास खोडून काढण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

बहुजन वंचित आघाडीचंही आव्हान

या निवडणुकीत भाजपचे नाराज इच्छुक उमेदवार माणिकराव कोकाटे ट्वीस्ट तयार करु शकतात. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची तयारी माणिकराव कोकाटे यांनी केली आहे. त्यामुळे युतीसाठी ही डोकेदुखी ठरु शकते. एकीकडे माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष लढण्याची तयारी केली आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पवन पवार यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. त्यामुळे समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे अशी दुरंगी होऊ पाहणारी लढत नाशिकमध्ये तिरंगी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यात अपक्ष उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडी कोणाला किती नुकसान पोहोचवणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.