परमबीर सिंह कसे पळाले? केंद्र सरकार आणि भाजपनं उत्तर द्यावं, नवाब मलिकांचं आव्हान

| Updated on: Nov 02, 2021 | 6:15 PM

ज्या व्यक्तीने आरोप लावले, तो व्यक्ती स्वतः फरार आहे आणि आरोप असलेले व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेले तर त्यांना अटक करण्यात आले. ही कारवाई राजकीय सूडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेली आहे', असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय.

परमबीर सिंह कसे पळाले? केंद्र सरकार आणि भाजपनं उत्तर द्यावं, नवाब मलिकांचं आव्हान
परमबीस सिंह, नवाब मलिक
Follow us on

मुंबई : ‘माजी गृहमंत्री अनिल देशमुख काल ईडी कार्यालयात स्वतःहून उपस्थित राहिले. त्याआधी त्यांनी सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला. अनिल देशमुख यांना देखील फसवले गेले आहे. त्यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप लावले, तो व्यक्ती स्वतः फरार आहे आणि आरोप असलेले व्यक्ती स्वतःहून चौकशीला गेले तर त्यांना अटक करण्यात आले. ही कारवाई राजकीय सूडातून आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना घाबरविण्यासाठी केली गेली आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. (How did Parambir Singh escape? Nawab Malik’s question to BJP and Central Government)

भाजपच्या नेत्यांनी ट्विट केले की, पुढचा नंबर अनिल परब यांचा आहे. याचा अर्थ सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. अनिल देशमुख यांना अटक केली असली तरी कायदा आपले काम करेल. एक ना एक दिवस सत्य लोकांसमोर येईलच. मात्र, परमबीर सिंह कुठे आहेत? याचे उत्तर केंद्रसरकारने दिले पाहीजे, अशी मागणीही मलिक यांनी केली.

परमवीर सिंहांना पळून जाण्यास भाजपने मदत केली का?

परमबीर सिंह हे महाराष्ट्रातून चंदीगढ येथे गेले. त्यानंतर ते परतले नाहीत. काही लोक सांगतात ते परदेशात गेले आहेत. लुकआऊट नोटीस असतानाही कोणताही व्यक्ती देश सोडून कसा जाऊ शकतो? एकतर हवाई मार्गे किंवा रस्ते मार्गाने जावे लागेल. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या तीन राज्यांतून नेपाळला जाता येते. या तीनही राज्यात भाजपचे सरकार आहे. इतर लोकांप्रमाणे परमबीर सिंह यांना पळून जाण्यास मदत करण्यात आली आहे का? याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल, असं आव्हान मलिक यांनी दिलंय.

‘अजित पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. कोणतीही संपत्ती ही बेनामी नसते. त्याचा कुणीतरी मालक असतोच. त्यामुळे दुसऱ्या कुणाचीतरी संपत्तीवर टाच आणून त्याला अजितदादांचे नाव देणे योग्य नसल्याचे नवाब मलिक म्हणाले. भाजपच्या नेत्यांची त्यांच्या नोकरांच्या, केंद्रीय मंत्र्यांच्या किचन कूकच्या नावे संपत्ती असल्याचेही समोर येऊ शकते. पण अशा प्रकरणातून केवळ बदनामी केली जाते. भुजबळ यांच्याबाबतीतही असेच झाले होते. महाराष्ट्र सदनात घोटाळा झाल्याचा आरोप होत असताना कोर्टाने त्यावर सुनावणी केली आहे. त्यात भुजबळांना निर्दोषत्व बहाल करण्यात आहे. केवळ घाबरवण्याचे आणि धमकावण्याचा खेळ सुरु आहे, यातून आम्ही घाबरुन जाणार नाही, असंही मलिक म्हणाले.

इतर बातम्या :

Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष

वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या; अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

How did Parambir Singh escape? Nawab Malik’s question to BJP and Central Government