‘काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जातेय, एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती, पण….’

| Updated on: Jun 29, 2021 | 3:56 PM

Sushilkumar Shinde | 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही.

काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जातेय, एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती, पण....
सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते
Follow us on

इंदापूर: सध्याच्या काळात काँग्रेसची वैचारिक परंपरा लयाला जात आहे. एकेकाळी पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. पण आता ती राहिली आहे का माहिती नाही, अशी खंत माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी इंदापूर येथील कार्यक्रमात बोलत होते. (Congress leader Sushilkumar Shind speech in Indapur Maharashtra)

काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमासाठी आज माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आज इंदापूर मध्ये आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे देखील उपस्थित होते.यावेळी सुशीलकुमार यांनी पक्षाच्या सद्यस्थितीविषयी खंत व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. 1974-75 च्या काळात काँग्रेसची वैचारिक शिबीरे भरवली जात होती. त्यामध्ये चुकीच्या धोरणांमध्ये सुधारणा केली जात असे. मात्र, सध्या तसे घडताना दिसत नाही. आम्ही नक्की कुठे आहोत, हे पाहणे अवघड झाले आहे. काँग्रेसची ही वैचारिक परंपरा संपत चालल्याची खंत सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच आपल्या शब्दाला पक्षात पूर्वीइतकी किंमत उरली आहे किंवा नाही, अशी साशंकताही त्यांनी बोलून दाखविली. त्यांच्या या वक्तव्याचे आता कशाप्रकारे राजकीय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.

गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसमध्ये अनेक अंतर्गत घडामोडी सुरु आहेत. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. पक्षातील 23 ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याची गरज व्यक्त केली होती. तर दुसरीकडे राज्य पातळीवर महाविकासआघाडी सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा सुरु केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे दिसत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा रोख नक्की कोणत्या दिशेने होता, याविषयी सध्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल : नाना पटोले

उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता, आता पुन्हा या भागातून लोकसभा, विधानसभेचे प्रतिनिधित्व वाढवून 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल, यासाठी काम करा असे, असे आवाहनही नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेय. काँग्रेस पक्ष हा देशाला तारणारा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा पक्ष असून, भारतीय जनता पक्षाने खोटी स्वप्ने दाखवून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम केले. लोकांचा आता भाजपावरचा विश्वास उडाला असून, काँग्रेसचा विचारच देशाच्या हिताचा आहे हे लोकांना पटल्यानेच आज धुळे जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांच्या काँग्रेस प्रवेशाने उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संघटनेला बळकटी मिळून उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचा झेंडा पुन्हा मानाने फडकत राहील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला होता.

संबंधित बातम्या:

…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल : नाना पटोले

काँग्रेसला स्वबळावर लढण्याची इच्छा, शिवसेनेला मिरच्या का झोंबतात?, काँग्रेस नेत्याचा सवाल

जळगावात महाविकास आघाडीत फूट, ग्रामपंचायतीत काँग्रेस स्वबळावर

(Congress leader Sushilkumar Shind speech in Indapur Maharashtra)