मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच, NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर

कृषी कायद्यावरुन आणखी एका मित्रपक्षाने NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच, NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर
Rashtriya Loktantrik Party chief Hanuman Beniwal
| Updated on: Dec 26, 2020 | 6:44 PM

नवी दिल्ली : भाजपप्रणित NDA आणि पर्यायाने केंद्रातील मोदी सरकारला धक्क्यावर धक्के सुरुच आहेत. कारण कृषी कायद्यावरुन आणखी एका मित्रपक्षाने NDA तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानातील राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीने (RLP) भाजपची साथ सोडली आहे. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे नेते हनुमान बेनीवाल (Hanuman Beniwal) यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत, हा निर्णय जाहीर केला. बेनीवाल म्हणाले, “शिवसेना आणि अकाली दलाने आधीच भाजपची साथ सोडली आहे, आता RLP ही भाजपपासून वेगळं होत आहे” (RLP left NDA annouce Hanuman Beniwal)

कृषी कायद्याला विरोध करताना हनुमान बेनीवाल म्हणाले, “आज मी एनडीए सोडत असल्याची घोषणा करतो”. दरम्यान, यापूर्वीच कृषी कायद्याला विरोध करताना सर्वात आदी पंजाबमधील अकाली दलाने NDA सोडण्याची घोषणा केली होती.

हनुमान बेनीवाल म्हणाले, “नरेंद्र मोदींकडे 303 खासदारांचं बळ आहे. त्यामुळेच ते कृषी कायदे मागे घेत नाहीत. 1200 किमी दूर असलेल्या राजस्थानातून शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत”.


भाजपची साथ सोडणारे पक्ष

सर्वात आधी शिवसेनेने भाजपची साथ सोडली. महाराष्ट्रातील सत्ता समीकरणे न जुळल्याने शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेतला. 2019 मध्ये केंद्रात मंत्रिपदावर असलेल्या शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता.

नुकतंच मोदी सरकारने कृषी कायदे आणल्यामुळे पंजाबमधील शिरोमणी अकाली दलानेही भाजपची साथ सोडली. या कायद्यांना कडाडून विरोध करत, प्रकाशसिंह बादल यांनी शेतकऱ्यांच्या बाजूची भूमिका घेतली.

त्यानंतर आता राजस्थानातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाने भाजपची साथ सोडली.

हनुमान बेनिवाल यांचा 3 समितींच्या सदस्यत्वाचा राजीनामा

बेनिवाल यांनी यापूर्वीच संसदेच्या 3 समितींच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ज्यात उद्योगांसंबधी स्थायी समिती, याचिका समिती आणि पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाची सल्लागार समितींचा समावेश आहे. बेनिवाल यांनी आपला राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पाठवला आहे.

2 लाख शेतकऱ्यांसह ‘चलो दिल्ली’

हनुमान बेनिवाल यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याचा सातत्यानं विरोध केला आहे. यापूर्वी त्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली होती.  26 डिसेंबरला 2 लाख शेतकऱ्यांसह राजस्थान ते दिल्ली पायी मोर्चा काढण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्याचबरोबर दिल्लीत पोहोचल्यावर NDA मध्ये राहायचं की नाही? याबाबतही घोषणा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

बेनिवालांचं अमित शाहांना पत्र

बेनिवाल यांनी यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कृषी कायद्यांबाबत एक पत्रही लिहिलं होतं. केंद्र सरकारनं नवे कृषी कायदे रद्द केले नाहीत, तर NDAमध्ये राहायचं की नाही याचा विचार करु, अशी भूमिका बेनिवाल यांनी घेतली आहे.

(RLP left NDA annouce Hanuman Beniwal)

संबंधित बातम्या  

भाजपचा अजून एक मित्रपक्ष दुरावणार?, बेनिवाल 2 लाख शेतकऱ्यांसह दिल्लीकडे कूच करणार