मी धर्मांतर केलेलं नाही, माझा धर्म विचारणारे हे कोण? उर्मिलाकडून टीकाकारांचा समाचार

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढत आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात तिच्यासमोर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान आहे. उर्मिला राजकारणात आल्यापासून तिला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेकदा ट्रोल करण्यात आलं. पण या सर्वांना तिने सडेतोड उत्तरं दिली आहेत. टीव्ही 9 मराठीच्या एनकाऊंटर या कार्यक्रमात तिने टीकाकारांचा समाचार घेतला. शिवाय आपण हरण्यासाठी कधीही लढत […]

मी धर्मांतर केलेलं नाही, माझा धर्म विचारणारे हे कोण? उर्मिलाकडून टीकाकारांचा समाचार
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढत आहे. उत्तर मुंबई मतदारसंघात तिच्यासमोर भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांचं आव्हान आहे. उर्मिला राजकारणात आल्यापासून तिला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अनेकदा ट्रोल करण्यात आलं. पण या सर्वांना तिने सडेतोड उत्तरं दिली आहेत. टीव्ही 9 मराठीच्या एनकाऊंटर या कार्यक्रमात तिने टीकाकारांचा समाचार घेतला. शिवाय आपण हरण्यासाठी कधीही लढत नाही, असं म्हणत तिने विजयाचा निर्धार व्यक्त केला.

हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याबद्दल उर्मिला मातोंडकरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर तिने उत्तर दिलं. “दहा दिवसांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये मुला हिणवलं गेलं. माझ्यासोबत मुलाखत करायची असेल तर अटकपूर्व जामीन अर्ज घेऊनच करा, नाहीतर तुमच्यावरही केस होईल. मी कधीही धर्मांतर केलेलं नाही, पण मला धर्म विचारणारे हे कोण आहेत? माझं हिंदू धर्मावर अफाट ज्ञान आहे. हिंदू धर्मावर माझ्याशी बोलायला या असं मी आव्हान देते. हिंदू धर्म हिंसक आहे असं मी कधीही म्हणाले नाही. हिंदू धर्माचं चुकीचं हिंसक रूप लोकांच्या समोर आणलं असं मी म्हणाले. माझ्यावर दाखल झालेली तक्रार धेडगुजरी आणि मूर्खांसारखी होती. माझ्या बाबतीत सूडाचं राजकारण केलं जातंय,” असं सडेतोड उत्तर उर्मिलाने दिलं.

उर्मिला मातोंडकरने 2016 मध्ये तिच्यापेक्षा 12 वर्ष वयाने लहान असलेला काश्मिरी तरुण मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केलं होतं. यावरुनच तिच्यावर विविध आरोप केले जातात. पण या सर्व आरोपांवर सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सचा समाचार घेतलाय. उर्मिला मातोंडकरने सध्याच्या सरकारवरही निशाणा साधला. “देशाची सगळी व्यवस्था सगळ्याच स्तरावर घसरली आहे. सामाजिक तोल गेलाय, खाण्याचं, विचारांचं स्वतंत्र राहिलेलं नाही, असं ती म्हणाली.

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थनार्थ आणि विरोधात कलाकारांची फौज एकवटली आहे. काही कलाकार विरोध करतात, तर काही समर्थन. यात बॉलिवूडची काही मंडळी असली तर काही जण कोणतीही भूमिका घेत नाहीत. यावरही उर्मिलाने उत्तर दिलं. बॉलीवूड म्हणजे सगळा देश नाही. बॉलिवूडमध्ये लोकांचे पैसे, करिअर पणाला लागलेलं म्हणून बॉलिवूडची माणस भूमिका घेत नाहीत, असं ती म्हणाली.

“आज मला ट्रोल केलं जातंय, आमिर खान, नसीरुद्दीन शाह यांना ट्रोल केलं जातं,” असं म्हणत तिने ट्रोलर्सवरही निशाणा साधला. शिवाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य वैगरे काहीही नसल्याचं ती म्हणाली.

मंत्री विनोद तावडे सध्या उत्तर मुंबई मतदारसंघात सक्रियपणे प्रचार करत आहेत. त्यांच्यावरही उर्मिलाने उत्तर दिलं. “विनोद तावडे कोकणातले आहेत म्हणून प्रचाराला गेले. मी एकही पैसा न घेता भाजपच्या ‘रद्दी उपक्रम’ बेटी बचाओ बेटी पाढाओ साठी माझा एक दिवस वाया घालवला. तावडे म्हणत असतील मला फसवलं तर ही फसलेली मी मुलगी कोकणातली आहे ती स्वतः यातून बाहेर येईल. मी गायब होण्यासाठी आलेली नाही, मी हरण्याकरता लढत नाही. मी राष्ट्र सेवा दलात जायचे, सेवा दलाचे माझ्यावर संस्कार आहेत,” असंही तिने सुनावलं.