Maharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले?

| Updated on: Jul 03, 2022 | 4:31 PM

Maharashtra Assembly Session : आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यानंतर नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

Maharashtra Assembly Session : कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं; अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले?
अजितदादा मुख्यमंत्र्यांना असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांना घेऊन बंड केलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपला साथ दिली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्यानेच त्यांनी बंड केल्याची चर्चा आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. ती त्यांनी का स्वीकारली नाही? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. या शिवाय शिंदे यांच्या बंडामागे भाजपचा (bjp) हात असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच ईडीच्या धाकामुळेही हे बंड झाल्याची चर्चा आहे. या सर्व चर्चा होत असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी थेट विधानसभेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे. कानात सांगितलं असतं तर मीच तुम्हाला तिथं बसवलं असतं, असं अजित पवार म्हणाले.

आज विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर विजयी झाले. त्यानंतर नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चिमटे काढले. 40 लोक शिंदेंसोबत गेले. सर्वांना वाटतं मंत्रीपद मिलेल मिळेल मिळेल. मला सांगता येत नाही काय होईल ते. एकनाथ शिंदेसाहेब आपण एकत्रं काम केलं आहे. कशामुळे घडलं? काय घडलं? तुम्ही माझ्या कानात सांगितलं असतं ना अजित जरा उद्धवजींना सांग अडीच वर्ष झाली. आता मला द्या. तर मीच सांगून तुम्हाला आम्हीच तिथं बसवलं असतं. काही अडचणच आली नसती. काहीच अडचण आला नसता, असा टोला अजित पवार यांनी लगावले.

हे सुद्धा वाचा

जयंतरावांच्या कानात सांगू नका

अजित पवार यांच्या या विधानाला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला आयुष्यात कधी वाटेल तर तुम्ही आमच्या कानात निश्चित सांगा. या आधी सांगितलं होतं. तेव्हा ते जमलं नव्हतं. 23 नोव्हेंबर रोजी. जयंतराव बरोबर ना? जयंतरावांच्या कानात कधीच सांगू नका. त्यांच्या कानात सांगणं धोका आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.

तर ही परिस्थिती आलीच नसती

अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात जुगलबंदी रंगलेली असतानाच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही टोलेबाजी केली. त्यांनीही सुधीर मुनंगटीवारांच्या विधानावर पलटवार केला. सुधीरभाऊ, कानात सांगायला पाहिजे होतं. तसं आम्ही फडणवीसांच्या कानात अडीच वर्षापूर्वी सांगितलं होतं. त्यांनी ते तेव्हा ऐकलं असतं तर ही परिस्थिती आली नसती, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.