BIG BREAKING | गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, दोन तास चर्चा; मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा तर होणारच

काँग्रेसने ज्या उद्योगपती गौतम अदानी यांना टार्गेट केलं आहे. त्याच गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट नियोजित होती, असंही सांगितलं जात आहे.

BIG BREAKING | गौतम अदानी यांनी घेतली शरद पवार यांची भेट, दोन तास चर्चा; मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चा तर होणारच
| Edited By: | Updated on: Apr 20, 2023 | 12:39 PM

मुंबई : काँग्रेसने ज्या उद्योगपती गौतम अदानी यांना टार्गेट केलं आहे. त्याच गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या दोघांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या चर्चेवेळी राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. या दोघांमध्ये चर्चा काय झाली हे गुलदस्त्यात आहे. मात्र, शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या भेटीने मुंबईपासून दिल्लीपर्यंत चर्चाना उधाण आलं आहे. या भेटीकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात आहे.

उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी गौतम अदानी सिल्व्हर ओकवर आले होते. यावेळी राष्ट्रवादीचा एकही नेता उपस्थित नव्हता. फक्त या दोघांमध्येच ही चर्चा झाली. चर्चा नेमकी कशावर झाली याचा तपशील मिळू शकला नाही. मात्र, काँग्रेसकडून गौतम अदानी यांना वारंवार टार्गेट केलं जात आहे. त्यावर या बैठकीत चर्चा झाली असावी असं सांगितलं जात आहे. ही भेट नियोजित होती, असंही सांगितलं जात आहे.

पवारांकडून पाठराखण

हिंडनबर्ग प्रकरणी काँग्रेसने गौतम अदानी यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अदानी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी काँग्रेसने संसदेतही आवाज उठवला होता. संसदेच्या बाहेरही महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली आंदोलन केलं होतं. तसेच गौतम अदानी यांच्या प्रकरणाची संसदेच्या जेपीसीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. विरोधक अदानी प्रकरणी आक्रमक असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अदानी यांची पाठराखण केली होती.

अदानी प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी करण्याची गरज नाही. त्यांची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीच योग्य आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. जेपीसी स्थापन केली तर त्यात विरोधी पक्षांचं संख्याबळ कमी राहील. सत्ताधाऱ्यांचं संख्याबळ सर्वाधिक राहील. त्यामुळे जेपीसी समितीचा अहवाल आला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. सत्ताधारी कुणाच्या बाजूने राहतील हे उघड आहे, असं पवार म्हणाले होते. पवारांच्या या विधानानंतरही काँग्रेसने जेपीसीची मागणी लावून धरली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अदानी यांनी पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Follow Us