Sindhudurg : ‘पवारांमुळेच राजकीय जडणघडण’ केसरकरांच्या एका वाक्याने बंड दरम्यानचा ‘तो’ किस्सा पुन्हा चर्चेत..!

| Updated on: Oct 01, 2022 | 5:47 PM

ज्या राष्ट्रवादीमुळे बंडाची भूमिका घेतली असे सांगणारे शिंदे गटाचे आमदार पवारांपुढे उघडपणे काही बोललेलच नाहीत. दीपक केसरकर यांनी तर पहिल्यापासून सावध पवित्राच घेतला होता. आज तर शरद पवार आणि ते एकाच व्यासपीठावर होते.

Sindhudurg : पवारांमुळेच राजकीय जडणघडण केसरकरांच्या एका वाक्याने बंड दरम्यानचा तो किस्सा पुन्हा चर्चेत..!
मंत्री दीपक केसरकर
Follow us on

महेश सावंत, Tv9 मराठी, सिंधुदुर्ग : भलेही राष्ट्रवादीमुळे आपण बंड केल्याचे शिंदे गटातील आमदार (Rebel MLA) सांगत असले तरी प्रत्यक्षात समोरासमोर असल्यावर त्याच पक्षातील नेत्यांचे गुणगाण हे काही नवीन राहिलेले नाही. यापूर्वीही सभागृहात त्याचा अनुभव आला आहे. अजित पवरांबद्दल बोलताना सर्वजण सावध पवित्रा घेत होते. एवढेच नाहीतर मध्यंतरी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) तर माफी मागितली होती. शिवाय त्यांच्यामुळेच आपली राजकीय जडणघडण झाल्याचे केसरकर म्हणाले होते. एकीकडे ज्यांच्यामुळे हे रामायण घडले त्यांचे गुणगाण केले जात आहे तर दुसरीकडे मात्र, थेट पक्षप्रमुखांवरही आता शिंदे गटातील आमदार टीका करु लागले आहेत. केसरकरांनी आता पुन्हा पवारांचे गोडवे गायले आहेत. निमित्त होते ते वेंगुर्ले येथील बॅ नाथ पै यांचा जन्मशताब्दी सोहळा.

नाथ पै यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवार यांनी नाथ पै यांचे योगदान आणि जुन्या आठवणी काय त्याला उजाळा दिला. तर दुसरीकडे केसरकरांनी मात्र, पवारांचे गोडव गायल्याचे चित्र होते. शरद पवार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे कधी काळी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही होते. शरद पवारांमुळेच आपली राजकीय जडणघडण झाल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीमुळे शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्याचे सांगितले जात असले तरी थेट शरद पवारांवर कोणी टीका करताना पाहवयास मिळत नाही.

शरद पवारांचे गोडवे गायले जात असले तरी दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी शिंदे गटातील आमदार सोडत नाही. आता तर दीपक केसरकर हे देखील थेट टीका करु लागले आहेत.

वेंगुर्ले येथील आयोजित कार्यक्रमात मंत्री दीपक केसरकर यांना व्यासपीठावर येण्यास उशिर झाला होता. मात्र, व्यासपीठावर आल्यापासून ते शरद पवारांच्या कानात बोलत असल्याचे चित्र होते. यावेळी विनायक राऊत, वैभव नाईक यांचीही उपस्थिती होती.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर ही वेळ राष्ट्रवादीमुळेच आल्याचे शिंदे गटाकडून सांगितले होते. दरम्यान, सत्ता स्थापनेच्या प्रसंगीच आपली जडणघडण ही शरद पवारांमुळेच असल्याचे केसरकरांनी स्पष्ट केले होते. आजही त्यांनी पवरांचे गोडवे गायले तर नार्वेंकरांच्या प्रवेशावरुन उद्धव ठाकरे यांना कोपरखळ्या.