ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांवरुन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा

| Updated on: Aug 16, 2021 | 11:26 PM

ठाणे जिल्ह्यातील कुठल्याच रस्त्याचं काम वेळेत पूर्ण केलं जात नाही. हा ठाणे जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जे ठेकेदार असतात ते बोगस असतात. त्यामुळे दिलेल्या मुदतीत काम होत नाही, असा आरोप कपिल पाटील यांनी केलाय.

ठाणे जिल्ह्यातील रस्त्याच्या कामांवरुन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटलांचा महाविकास आघाडीवर निशाणा
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची पत्रकार परिषद
Follow us on

ठाणे : केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेला आज सुरुवात झाली. ठाणे जिल्ह्यात ही यात्रा दाखल झाल्यानंतर कपिल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील कुठल्याच रस्त्याचं काम वेळेत पूर्ण केलं जात नाही. हा ठाणे जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जे ठेकेदार असतात ते बोगस असतात. त्यामुळे दिलेल्या मुदतीत काम होत नाही, असा आरोप कपिल पाटील यांनी केलाय. (Kapil Patil criticizes the Mahavikas Aghadi government over the condition of roads in Thane district)

कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा आज ठाणे जिल्ह्यातून सुरु झाली. त्यानंतर आजच्या यात्रेची सांगता कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात झाली. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी रस्त्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आपण ज्या कल्याण शीळ रस्त्यावरुन यात्रा केली. त्या रस्त्याची काय अवस्था आहे? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना कल्याण-शीळ रस्त्याचं काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरु आहे. त्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आहे. याबाबत भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या कामाची चौकशी केली जाईल, असं पाटील यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर शहापूर-कर्जत हायवे या रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप पाटील यांनी केलाय.

मनसे, सेना पदाधिकाऱ्यांकडून पाटील यांचं स्वागत

मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, योगेश म्हात्रे, माजी नगरसेवक कुणाल पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेत पाटील यांचं स्वागत केलं. याविषयी पाटील यांनी सांगितलं की, राजू पाटील यांच्याशी माझे घरचे संबंध आहे. मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना ते सदस्य होते. ज्याला कोणाला मला आशीर्वाद द्यायचा आहे, ते आशीर्वाद देऊ शकतात. त्याला पक्षाच्या चौकटीत बांधणे योग्य होणार नाही, असं पाटील यांनी म्हटलंय.

‘कुणाला मोडीत काढण्यासाठी मंत्रिपद नाही’

ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचं वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी कपिल पाटील यांना केंद्रात मंत्रीपद दिलं असल्याची राजकीय वर्तुळात आहे. याविषयी पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रीपदं दिली आहेत. ती भाजपला मोडित काढण्यासाठी दिली आहेत का? कुणाला मोडीत काढण्यासाठी मला मंत्री पद दिलं नाही तर माझ्या पक्षाचे सदस्य जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी मी काम करणार असल्याचं पाटील यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

मराठा आरक्षणावर चॅनेल्ससमोर चर्चा होऊनच जाऊ द्या; चंद्रकांतदादांनी आघाडीला ललकारले

शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहोचत नाहीत, युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे : देवेंद्र फडणवीस

Kapil Patil criticizes the Mahavikas Aghadi government over the condition of roads in Thane district