जरांगे पाटील केवळ निमित्त, भाजपचे मुख्य लक्ष… नाना पटोले यांचा नेमका आरोप काय?
कर्जाची रक्कम विकासासाठी न वापरता आपल्या कंत्राटदारांना वाटली. सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. गेल्या बजेटमधली 50 टक्के रक्कम खर्च झाली नाही. याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही.
![जरांगे पाटील केवळ निमित्त, भाजपचे मुख्य लक्ष... नाना पटोले यांचा नेमका आरोप काय? जरांगे पाटील केवळ निमित्त, भाजपचे मुख्य लक्ष... नाना पटोले यांचा नेमका आरोप काय?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/02/nana-patole-.jpg?w=1280)
नवी दिल्ली | 28 फेब्रुवारी 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभा घेत आहेत. पण, त्याचा सर्व खर्च शासनाच्या तिजोरीतून होतोय. 12 कोटी रुपये मंडप बांधायला, 3.5 कोटी हेलिपॅडसाठी खर्च होतोय. हा जनतेच्या पैशाचा गैरवापर आहे. एसटीमध्ये इतकी लोक भरली की कंडक्टर महिलांच्या अंगावरून चालत गेले. महिला आमच्यासोबत आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका बचत गट या सगळ्यांना एकत्र करून लोकप्रियता दाखवण्याचा असफल प्रयत्न केल अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केली.
पंतप्रधान यांना खुश करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. या सगळ्याचा आम्ही निषेध करतो. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासकीय कर्मचारी यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. केवळ फुकट धान्य दिलं की जनतेचं भागत अशी सरकारची धारणा आहे. त्यामुळे महागाई कमी करण्यास सरकार काही करत नाही असे नाना पटोले म्हणाले.
राज्यावर 8 लाख कोटींचे कर्ज आहे. 1 लाख कोटी इतकी वित्तीय तूट आहे. कर्जाची रक्कम विकासासाठी न वापरता आपल्या कंत्राटदारांना वाटली. सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. गेल्या बजेटमधली 50 टक्के रक्कम खर्च झाली नाही. याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही, असा आरोप पटोले यांनी केला.
2014 मध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला 1.5 पट भाव देण्याचं आश्वासन दिलं. स्वामिनाथन समिती लागू करण्याची घोषण केली. कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, निवडणूक जिंकल्यानंतर काहीच केलं नाही. जनतेला फसवलं तर महाराष्ट्र माफ नाही करणार नाही. याचे पडसाद देशभरात उमटतील असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
नांदेड काँग्रेसची भूमी आहे
नांदेडचे तीनही आमदार काँग्रेस सोबतच राहणार. आम्हाला कोणाची भीती नाही. ज्यांना भीती होती ते गेले. गोपछडे म्हणतात अजगर आले आहेत. आत्तापासूनच त्यांच्यात सुरू झालं आहे. उद्या नांदेडला बैठक घेतली जाईल. लोकसभेसाठी सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाईल. ही जागा आम्ही बहुमताने जिंकू. तीन माजी महापौर आमच्यासोबत आहेत. प्रभागात विकासासाठी निधी देण्याचं प्रलोभन दाखवून लोकांना घेतलं आहे. थोड्याच दिवसात त्यातील कित्येकजण परत येतील. नांदेड ही काँग्रेसची भूमी आहे. नांदेड संदर्भात आम्हाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही त्यांना आहे असा टोलाही त्यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांना लगावला.
जरांगे पाटील हे केवळ निमित्त
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांजे पाटील यांची SIT चौकशी लावली. मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला म्हणून SIT चौकशी लावली. जरांगे पाटील हे केवळ निमित्त आहे. SIT च्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत. मुख्यमंत्री, त्यांचे OSD यांच्यासोबत जरांगे पाटील यांचे नेमकं काय बोलण झालं? त्यामुळे अप्रत्यक्षपणे भाजपने मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे असा आरोप नाना पटोले यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी आमच्यासह अनेकांना शिव्या घातल्या आहेत. तेव्हा काही झालं का? त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, ना ओबीसी समाजाला, त्यांना कसले फायदे द्यायचे नाहीत. पाच वर्ष झाली ओबीसी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे पैसे दिले नाहीत. मुख्यमंत्री म्हणाले करेक्ट कार्यक्रम केला. पण, तुमचे नेमकं काय बोलणं झालं ते सभागृहासमोर सांगा असे आव्हान त्यांनी सरकारला दिले.