सुशील कुमार शिंदेंना पुन्हा धक्का, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी मैदानात?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

सोलापूर : स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरही राजकारणाच्या क्षितिजावर ठळकपणे दिसून येणारा जिल्हा म्हणजे सोलापूर. राज्याला एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सोलापूर जिल्ह्याच्या रुपानेच मिळालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्हा सतत चर्चेत राहिला. मात्र 2014 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या याच सोलापूर लोकसभा […]

सुशील कुमार शिंदेंना पुन्हा धक्का, भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी मैदानात?
Follow us on

सोलापूर : स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतरही राजकारणाच्या क्षितिजावर ठळकपणे दिसून येणारा जिल्हा म्हणजे सोलापूर. राज्याला एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद सोलापूर जिल्ह्याच्या रुपानेच मिळालं. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यामुळे सोलापूर जिल्हा सतत चर्चेत राहिला. मात्र 2014 च्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या याच सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचं कमळ फुललं आणि शिंदेंसमोर नवखे असलेले भाजपच्या शरद बनसोडे यांचा विजय झाला. मात्र सत्तांतरानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि आता परिस्थिती वेगळी बनली आहे.

2014 च्या मोदी लाटेच्या सुनामीत मनमोहन सिंह यांच्या मंत्रिमंडळातील ज्या दिग्गज मंत्र्यांच्या मतदारसंघातील बुरुज ढासळली, त्यातील एक दिग्गज नाव म्हणजे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे. मोदींच्या सुनामीत ऐनवेळी पक्षाने बोहल्यावर चढविलेल्या शरद बनसोडेंनी दिग्गज शिंदेंचा तब्बल दीड लाख मतांनी पराभव केला. शिंदेंच्या पराभवाच्या निम्मिताने काँग्रेसचा 40 वर्षांचा मतदारसंघातील बुरुज ढासळला. मोदी लाटेत भाजपने विजयश्री खेचून आणलेला मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी भाजपच्या नेतेमंडळींनी कंबर कसली आहे.

विद्यमान खासदार शरद बनसोडे यांची सुमार कारकीर्द आणि पक्षातीलच लोक बनसोडेंवर नाराज असल्यामुळे आपला पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिंदेंनी गेल्या काही महिन्याभरापासून जनसंपर्क वाढवला आहे. तर दुसरीकडे सुमार कामगिरी आणि बेताल वक्त्यव्यामुळे ढासळत गेलेली प्रतिमा भाजपने नव्या उमेदवारीचा शोध घेतला आणि या उमेदवारीचा शोध सुरु असताना सोलापुरातील दोन देशमुख अर्थात पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचं शह-काटशहाचं राजकारण सुरूच होतं. सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी खासदार अमर साबळे यांना संभाव्य उमेदवार म्हणून मतदारसंघातला वावर सुरु ठेवला. तर दुसरीकडे बाहेरचा उमेदवार नको अशी स्पष्ट भूमिका घेत  मतदारसंघातील लिंगायत मतांची संख्या आणि भाविकांची संख्या पाहून गौडगाव येथील डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांचं उमेदवार म्हणून नाव पुढं केलंय. जयसिद्धेश्वर महास्वामीजी हे धर्मगुरू आहेत आणि त्यांच्या मानणाऱ्या लोकांची संख्या पाहता त्यांची उमेदवारी पुढे केल्याने अमर साबळे हे नाव मागे पडलंय. तर या उमेदवारीने थेट शिंदेंना पुन्हा एकदा धक्का देण्याचा प्रयत्न केलाय.

अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी सर्वदूर परिचित आहेत. शिवाय त्यांना मानणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. तर स्वतः महास्वामींनीसुद्धा यासाठी कंबर कसली आहे. उमेदवारी मिळाली तर आपण निवडणूक लढवू असं सांगत मुख्यमंत्र्यापासून ते भाजपच्या वरिष्ठापर्यंत गाठीभेटी सुरु केल्या आहेत. महाराजांचे शैक्षणिक काम, मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि भक्तांची संख्या पाहता महास्वामीजींचे पारडे जड मानलं जातं आहे. त्यातच धर्मगुरूंनी  राजकारणात येऊ नये, असा सूरुही उमटू लागलाय. तसा ठरावही अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने केलाय. तर विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी तर आपणच पुन्हा लोकसभेचे उमेदवार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे भाजपात नेमकं काय चाललंय याचा सध्या तरी कुणाला ताळमेळ नाही.

सध्या उमेदवारीवरून भाजपमध्ये एकमत झालं नसलं तरी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीच संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते रोज बैठका घेऊन आपला कौल घेत आहेत. शरद बनसोडे हेच उमेदवार गृहीत धरून त्यांची सुमार कारकीर्द आणि मतदारसंघातील ढिली पकड पाहून, मतदारसंघात आपलं बस्तान बसवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र आता भाजपने ऐनवेळी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींना निवडणूक रिंगणात उतरविले तर शिंदेंमोठी अग्नीपरीक्षा देत आपल्या पराभवाचा वचपा कसा काढतात हे पाहावं लागणार आहे.