जालियन बाग आंदोलनानंतर इंग्रजांनाही कायदा मागे घ्यावा लागला, आज त्याचीच पुनरावृत्ती : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Feb 08, 2021 | 3:46 PM

राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केलीय.

जालियन बाग आंदोलनानंतर इंग्रजांनाही कायदा मागे घ्यावा लागला, आज त्याचीच पुनरावृत्ती : जितेंद्र आव्हाड
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केलीय. तसेच मोदी सरकारची तुलना थेट इंग्रजांशी करत मोदी सरकारला देखील इंग्रजांप्रमाणे शेतकऱ्यांपुढे झुकावं लागेल, असं मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांनाही उत्तर दिलं (Jitendra Awhad criticize Modi Government over Farmer Protest in Delhi).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला इतिदास आठवतो. 1908 दरम्यान रॉलेट अॅक्ट नावाचा कायदा होता. हा कायदा लॉर्ड चेम्सफर्डने आणला होता. त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला. यामुळे जलियानबाग येथे आंदोलन झालं. जनरल डायरने गोळीबार केला. आंदोलन चिघळलं. इंग्रज सरकारला हा कायदा मागे घ्यावा लागला. या इतिहासाची पुनरावृत्ती होतेय.”

‘बॉलिवूड सेलिब्रिटींना शिकवून पाठवलंय असं दिसतंय’

“हा देश दंडुक्यांना, लाठ्याकाठ्यांना घाबरत नाही. देशात क्रांती घडेल, तेव्हाच देश शांत बसेल. सरकारने लोकशाहीचं तंत्र वापरावं, चर्चा करावी. सचिनने शॉट कसा मारावा हे लोकांनी सांगायची गरज नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. असं दिसतंय की या बॉलिवूड सेलिब्रिटींना शिकवून पाठवलंय. ते सर्व एकाच आशयाचं ट्विट करत आहेत. जे सत्य आहे ते समोर येणारच आहे,” असंही आव्हाड यांनी नमूद केलं.

‘शरद पवारांनी यू टर्न घेतला हा अनुमान कसा काढता?’

“शरद पवारांनी यू टर्न घेतला हा अनुमान कसा काढता? त्यांनी काय नाव घेतलं, भाजपचे काही खासदारही कायद्याला विरोध करत आहेत. अद्याप कुणी यू टर्न घेतला नाहीये. मोदींचा स्वतःच्या अस्तिवासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे. कायदा येणार होता, छापलं होतं, असं काही नाही. लोक या कायद्याला काळा कायदा म्हणतायत,” असंही आव्हाड म्हणाले.

‘बंद खोलीचा इतिहास दोघांनाच माहिती, जनतेला माहितीये कोण खरं बोलतंय’

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बंद खोलीचा इतिहास ऊद्धव ठाकरे आणि अमित शाह यांनाच माहिती आहे. त्या दोघांशिवाय तिसऱ्या कुणालाही याविषयी काही माहिती नाही. त्यामुळे तुम्ही काहीही बोलू शकत नाही. आम्हाला काय माहिती तुम्ही बंद खोलीत काय केलं. त्या बैठकीत साक्षीदार ठेवायला पाहिजे होता. बदनामीने काही फरक पडत नाही. जनतेला माहिती आहे कोण खरं बोलतं कोण खोटं बोलतं.”

‘नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं’

जितेंद्र आव्हाड यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका करणाऱ्यांवरही निशाणा साधला. ज्यांची नजर वाकडी त्यांना सगळंच वाकडं दिसतं. तीन चाकी सरकार म्हणाले, म्हणू द्या, पण तीन चाकी हेलिकॉप्टरही असतं, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल

“सचिन आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील?” स्वाभिमानीचं सचिनच्या घराबाहेर आंदोलन

देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात स्वस्त, दिल्ल्लीच्या दिव्याखाली अंधार; संजय राऊतांचा घणाघात

संबंधित व्हिडीओ :

Jitendra Awhad criticize Modi Government over Farmer Protest in Delhi