
Gopichand Padalkar Vs Jitendra Awhad : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. आव्हाडांनी दिलेल्या मंगळसूत्र चोर या घोषणेनंतर त्यांचा पडळकर यांच्यासोबतचा वाद वाढला होता. त्यानंतर आता विधानभवनाच्या लॉबीमध्येच पडळकर आणि आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर जितेंद्र आव्हाड चांगलेच संतापले आहेत. विधिमंडळातच आमदार सुरक्षित नाहीत. असं असेल तर आमदार कशाला राहायचं? असा संतप्त सवाल त्यांनी केलाय.
अख्ख्या महाराष्ट्राला समजलं आहे की पडळकरांच्या लोकांनी हल्ला केला आहे. आम्हाला यापेक्षा जास्त कोणताही पुरावा द्यायचा नाही. तुम्ही विधानपरिषदेत गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते आमच्यावर हल्ले करत असतील तर आम्ही सुरक्षित नाहीयोत, असा त्याचा अर्थ होतो, असा जळजळीत सवाल त्यांनी केला. तसेच मी सुरक्षित नसल्याचे ट्वीट अगोदरच केलेले आहे. मला आई-बहिणीवर शिव्या देण्यात आल्या. तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली. कुत्रा, डुक्कर असं काहीही बोलण्यात आलं, असा गंभीर आरोपही आव्हाड यांनी केलाय.
विधानसभेत नेमकं काय चालू आहे? मी भाषण करून बाहेर आलो होतो. थोडी मोकळी हवा घेण्यासाठी बाहेर आलो होते. हे गुंड मलाच मारण्यासाठी आले होते. म्हणजे विधानसभेत विधिमंडळाच्या पायऱ्यावर आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार. आमचा गुन्हा काय? असाही प्रश्न आव्हाड यांनी केलाय.
कोणीतरी मवाल्यासारखा येतो आणि आई-बहिणीवरून शिव्या देतो तर अशा भाषेला अधिकृत भाषा म्हणून जाहीर कारा ना. सत्तेचा एवढा माज चढला आहे, अशी कठोर टीका आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.
विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल विरोधकांनी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाची दखल विरोधकांनी घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील गंभीर सवाल उपस्थित केले आहेत. विधिमंडळाच्या बाहेर अशा घटना आणि विधिमंडळाच्या प्रांगणात हे प्रकार घडणे यात फरक आहे. हे गुंड विधानभवनात आलेच कसे? त्यांना पास कसा मिळाला? त्यांना पास देणारा आमदार कोण? याबाबत चौकशी झाली पाहिजे? अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केला आहे.