जेएनयूमधील हिंसाचाराला मोदी-शाह जबाबदार? जितेंद्र आव्हाड म्हणतात…

| Updated on: Jan 06, 2020 | 1:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जेएनयूमधील विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत, असा घणाघात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जेएनयूमधील हिंसाचाराला मोदी-शाह जबाबदार? जितेंद्र आव्हाड म्हणतात...
Follow us on

मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता जवाहरलाल नेहरु विद्यालयात (जेएनयू) विद्यार्थ्यांच्या बुद्धिमतेला घाबरत आहेत. जेव्हा विचारसरणी किंवा बुद्धिमतेला सरकार घाबरतं तेव्हा देशात अराजकता येण्याची शक्यता असते’, असे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले.

जवाहरलाल नेहरु विद्यालय (जेएनयू) परिसरात झालेल्या हिंसाचाराचा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी तीव्र शब्दात निषेध केला. जेएनयू येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे काही विद्यार्थी संघटनांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात देखील जितेंद्र आव्हाड सहभागी झाले.

‘विद्यार्थी शांतपणे बसले आहेत. हे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत. ते गांधीवादी आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. जे काही जेएनयूमध्ये झालं ते माणुसकीला धरुन नव्हतं याच्यामध्ये कुणाच्याही मनात शंका असता कामा नये. सरकार कुणाचं आहे? याच्यापेक्षा माणुसकी सर्वांच्या मनात असते आणि आपण माणुसकीला धरुन चालतो. त्यामुळे जेएनयूमध्ये जे झालं त्याचा आम्ही निषेध करतो’, असं आव्हाड म्हणाले. ‘हे विद्यार्थी शांतपणाने आंदोलन करत आहेत. त्यांचे मी कौतुक करतो आणि त्यांच्या भावना मी सरकारपर्यंत घेऊन जाणार आहे’, असं देखील ते म्हणाले.

‘कालचा जेएनयूचा प्रकार म्हणजे या सरकारने आता गुंडांना हाताशी धरलेले आहे, असं काहीसं चित्र दिसतंय. पोलिसांच्या समोर जेएनयूच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यीनींना मारण्यात आलं. हे क्रूर आहे. लोकशाहीची संपूर्णपणे हत्या केली जात आहे आणि हा सरकारप्रेरित हिंसाचार आहे’, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

‘माझी राजकारणातील सुरुवात विद्यार्थी दशेपासून झाली. विद्यार्थी दशेपासून संघर्ष करत मी इथपर्यंत आलो. विद्यार्थी जेव्हा एखादं आंदोलन मनावर घेतात तेव्हा समजून जायचं की यात काहीतरी गंभीर बाब आहे. जे काल रात्री जेएनयूमध्ये घडलं ते अत्यंत लाजिरवाणं होतं. ज्याप्रकारे गुंडांना पाठवलं गेलं आणि विद्यार्थ्यांना मारलं गेलं ही चांगली गोष्ट नाही’, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी खेद व्यक्त केली.

‘या देशामध्ये कुणाचंही सरकार असो पण अशाप्रकारच्या घटना घडायला नको. आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी महाविद्यालयात पाठवतात. प्रत्येक विद्यार्थ्याला कोणत्या विचारसरणीच्या पाठिमागे जायचं हा त्याचा वैयक्तीक विषय आहे. तो विद्यार्थी कधी कम्युनिस्टसोबत तर कधी दुसऱ्या कुणासोबत जाऊ शकतो. मात्र, कोणत्याही सरकारला त्याला मारण्याचा अधिकार नाही’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘विचारधारेचं सन्मान करणं हे लोकशाहीचं गणित आहे. दोघांमध्ये मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद असायला नको. गुंडांचा वापर करुन तुम्ही जेएनयूला संपवू शकत नाही. यावरुन स्पष्ट होतं की सरकार घाबरत आहे, तर ते जेएनयूच्या हुशारीला घाबरत आहे. ज्यादिवशी सरकार हुशारीला घाबरते त्यादिवशी समजायचं की देशात आराजकता येणार आहे’, असंही आव्हाड म्हणाले.

मोदी सरकारला याबाबत दोषी का ठरवलं जात आहे? याबाबत आव्हाड यांना प्रश्न विचारला असता, ‘शेवटी दिल्लीमध्ये पोलीस कुणाचे आहेत? दोष त्यांच्यावरच येईलना? उद्या मुंबईत काही झालं तर दोष कुणावर येईल? ज्यांचे पोलीस आहेत, त्यांच्यावर येणार. त्यामुळेच मला या विद्यार्थ्याचं कौतुक वाटतं की एवढं सारं होऊनसुद्धा शांतपणे आंदोलन करत आहेत’, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘यावर काही कारवाई होणार नाही. डोळ्यासमोर दिसत आहे. काय झालं ते डोळ्यासमोर दिसल्यानंतर तुम्हीच त्याचं अवलोकन करु शकतात. जनता बघू शकते काय झालं ते. माझ्या घरात दरोडा पडला आणि दरोडेखोराने जाऊन सांगितलं की यांनी मला घरात घेऊन जाऊन मारलं तर तू घरात आला कशाला होता? प्रश्न असा निर्माण होतो’, असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.