“दिल्लीतील शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्याच्या तयारीत नाहीत”

| Updated on: Dec 15, 2020 | 6:49 PM

"संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे,"

दिल्लीतील शेतकरी संघटनांचे नेते आपला हेका सोडण्याच्या तयारीत नाहीत
केशव उपाध्ये, भाजप प्रवक्ते
Follow us on

ठाणे :दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या शंकांचे पूर्ण निरसन करण्याची आमची तयारी आहे. मात्र, या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत. या संघटनांच्या नेत्यांना फक्त मोदी सरकारला अडचणीत आणायचे आहे,” अशी टीका भाजप प्रवक्ते केवश उपाध्ये यांनी केली.  तसेच,  या आंदोलनाच्या आडून काही शक्ती अराजक माजविण्याचा प्रयत्न  करत असल्याचा आरोपही उपाध्ये यांनी केला. ते ठाणे येथे भाजपने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. (Keshav Upadhye criticizes Delhi farmers protest)

संघटेनेचे नेते हेका सोडण्यास तयार नाहीत

केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेले आहे. शेतकऱ्यांंच्या या आंदोलनामुळे देशभरात आंदोलनं केली जात आहेत. यावर उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्र सरकार पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी अनेक दिवसांपासून चर्चा करीत आहे. अचानक या संघटनांनी दिल्लीत येऊन आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला. दिल्लीत आल्यावरही या संघटनांच्या नेत्यांकडे सरकारने चर्चेसाठी प्रस्ताव पाठवले. चर्चेद्वारे शंका दूर व्हाव्यात, तसेच कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचीही तयारी सरकारने दर्शविली आहे. तसे प्रस्तावही या संघटनांच्या नेत्यांकडे पाठवले आहेत. मात्र आंदोलनकर्त्या संघटनांचे नेते आपला हेका सोडण्यास तयार नाहीत,” असे उपाध्ये म्हणाले. (Keshav Upadhye criticizes Delhi farmers protest)

यांना फक्त राजकारण करायचं

यावेळी बोलताना उपाध्ये यांनी शेतकरी संघटनाच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. फक्त राजकारणासाठी हा मुद्दा लावून धरला जात असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. “या संघटनांच्या नेत्यांना कृषी कायद्याच्या निमित्ताने केवळ राजकारण करायचे आहे, असे आता स्पष्ट होऊ लागले आहे. किमान आधारभूत किमतीने केंद्र सरकारकडून अन्न-धान्याची खरेदी यापुढेही चालू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे अनेकदा स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना बाजार समित्यांबरोबर आपल्या शेतमालाच्या विक्रीचा आणखी एक पर्याय उपलब्ध राहणार आहे,” असे उपाध्ये म्हणाले.

शेतकरी नेते अडून बसले आहेत

“शेतकरी त्याच्या पसंतीनुसार आपला शेतमाल कोठेही विकू शकतील. तसेच कॉन्ट्रॅक्ट शेती बाबतचे गैरसमजही केंद्र सरकारने दूर केले आहेत. असे असताना कायदे रद्दच करा या मागणीवर संघटनांचे नेते अडून बसले आहेत. या नेत्यांना कायद्याला विरोध करून राजकीय हेतू साध्य करायचे आहेत,” असा घणाघाती आरोप यावेळी केशव उपाध्ये यांनी शेतकरी संघटनांच्या नेत्यांवर केला.

दरम्यान, शेतकऱ्यांचे दिल्लीच्या सीमेवर अजूनही आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ते ठाम आहेत. त्यांच्या या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही- गडकरी

(Keshav Upadhye criticizes Delhi farmers protest)