मोदींनी राजीव गांधींचं नाव हटवलं, काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया, नेमकं काय घडतंय?

| Updated on: Aug 06, 2021 | 3:38 PM

खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल. यापूर्वी या पुरस्काराला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान, खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय.

मोदींनी राजीव गांधींचं नाव हटवलं, काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया, नेमकं काय घडतंय?
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत,पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विटरद्वारे केलीय. भारतातील अनेक नागरिकांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद (Major Dhyanchand) यांच्या नावानं असावं, असं म्हटलं होतं. मी त्यांच्या मतांसाठी आभार मानतो, असं म्हटलं आहे. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्कार आतापासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार नावानं ओळखला जाईल, असं म्हटलं. यापूर्वी या पुरस्काराला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं. दरम्यान, खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलण्यावरुन काँग्रेसनं पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. (Sachin Sawant criticizes PM Narendra Modi for changing the name of Khel Ratna award)

‘मोदींच्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शन’

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केलीय. ‘राजीव गांधी खेळरत्न पुरस्काराचे नामकरण मेजर ध्यानचंद खेलरत्न होत आहे. मेजर ध्यानचंद यांचे नाव कोणत्याही ठिकाणी व पुरस्काराला देण्याचे स्वागतच आहे. त्यांच्या नावाने सर्वोत्तम खेळ पुरस्कार 2002 पासून आधी आहेच. दुर्दैवाने मोदींनी कोत्या मनोवृत्तीच्या राजकारणात त्यांचे नाव ओढले आहे’, अशी टीका सचिन सावंत यांनी केलीय.

‘कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही’

त्याचबरोबर, ‘शहीद राजीव गांधी हे देशाचे सुपुत्र व हिरो होते. त्यामुळे मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. स्वतःची लाईन वाढत नाही तर दुसऱ्याची कमी करणे ही मोदींची मानसिकता आहे. तरीही जर खेळाडूंचे नाव देण्याची तात्विक भूमिका असेल. तर मोदी व जेटली यांच्या नाव ज्या स्टेडियमना दिले आहे ते बदलून दिग्गज खेळाडूंचे नाव देण्याची सुरुवात करा. सरदार पटेलांचे नाव छोटं करुन हयातीतच स्वतःचे नाव स्टेडियमला देणारे मोदी निश्चितपणे याचा विचार करतील ही अपेक्षा. मेजर ध्यानचंद अमर रहे! राजीव गांधी अमर रहे!’, असा खोचक टोलाही सावंत यांनी मोदींना लगावलाय.

संबंधित बातम्या : 

Special Report : ज्यांच्यासाठी राजीव गांधींचे नाव हटवले, ते मेजर ध्यानचंद कोण होते?

पदक नाही म्हणून काय झालं, तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची, नरेंद्र मोदींशी बोलताना महिला हॉकी टीम गहिवरली

Sachin Sawant criticizes PM Narendra Modi for changing the name of Khel Ratna award