Madhya Pradesh | शिवराजसिंह सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 28 पैकी 12 मंत्री शिंदे गटाचे

| Updated on: Jul 02, 2020 | 1:25 PM

"अमृत ​​मंथनातून विष बाहेर पडते, विष तर 'शिव' भगवान यांनाच प्राशन करावे लागते" असे सूचक वक्तव्य काल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले होते. (Madhya Pradesh Shivraj Singh Chauhan Cabinet Ministry Expansion)

Madhya Pradesh | शिवराजसिंह सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, 28 पैकी 12 मंत्री शिंदे गटाचे
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला. राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी राजभवनात एकूण 28 नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यामध्ये 20 कॅबिनेट मंत्री, 8 राज्यमंत्री यांचा समावेश होता. गोपाळ भार्गव, विजय शहा, यशोधरा राजे शिंदे असे अनेक बडे चेहरे शिवराजसिंह सरकारच्या मंत्रिमंडळात दिसणार आहेत. मात्र या 28 पैकी 12 मंत्री ज्योतिरादित्य शिंदे गटाचे असल्याने त्यांचा दबदबा पाहायला मिळणार आहे. (Madhya Pradesh Shivraj Singh Chauhan Cabinet Ministry Expansion)

काँग्रेसमधून आलेले खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचं मंत्रिमंडळावर वर्चस्व राहील, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. त्यातच  “अमृत ​​मंथनातून विष बाहेर पडते, विष तर ‘शिव’ भगवान यांनाच प्राशन करावे लागते” असे सूचक वक्तव्य काल मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले होते. शिवराज यांच्या वक्तव्याचे अनेक अर्थ लावले जात आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे समर्थकांचे वर्चस्व पाहून शिवराज दु:खी आहेत का? असा सवालही विचारला जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर होऊन 100 दिवसांचा काळ लोटला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसविरुद्ध बंडखोरी करत पाठिंबा दिल्याने भाजपला सरकार स्थापन करता आले. त्यामुळे साहजिकच आपल्या समर्थकांना सामावून घेण्यास शिंदे आग्रही होते.

चौहान नाराज का?

शिवराजसिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. यापूर्वी सत्तेची सर्व सूत्र आणि निर्णयाचे अधिकार त्यांच्या हातात असायचे, परंतु यावेळी तसे नाही. कारण भाजपाकडे पूर्ण बहुमत नाही. काँग्रेस बंडखोरांमुळेच त्यांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे इतर पक्षातील बंडखोरांसोबतच आपल्या समर्थकांचे समाधान करण्याची दुहेरी जबाबदारी शिवराजसिंह चौहान यांच्यावर आहे.

एवढेच नाही, तर आता चौहान यांचे निकटवर्तीयही त्यांना डोळे वटारुन दाखवत असल्याचे बोलले जाते. याशिवाय राष्ट्रीय नेतृत्वही चौहान यांना लगाम घालत आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे सर्व बाजूंनी शिवराज घेरले गेले आहेत. याचा फायदा अनेक संधीसाधू घेत असल्याचंही म्हणतात.

चौहान यांनी 23 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन झाल्याने मुख्यमंत्री चौहान यांनी 29 दिवस एकट्यानेच सरकार चालवले. त्यानंतर 21 एप्रिल रोजी पाच सदस्यीय मंत्रिपरिषद स्थापन झाली. यामध्ये काँग्रेसमधून आलेल्या ज्योतिरादित्य शिंदे गटातील तुलसी सिलावट आणि गोविंदसिंग राजपूत यांचा समावेश होता. (Madhya Pradesh Shivraj Singh Chauhan Cabinet Ministry Expansion)