Maharashtra Cabinet : शिंदे गटात मंत्रिपदावरुन रस्सीखेच, आमदार संजय सिरसाट नाराज असल्याची चर्चा; कुणाची वर्णी लागणार?

| Updated on: Jul 01, 2022 | 3:33 PM

औरंगाबादेत तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी संजय सिरसाट यांना एखादं महामंडळ किंवा अन्य कोणत्या पदावर बोलवणं होण्याचीच शक्यता वर्तवली जातेय. मात्र संजय सिरसाट हे राज्यमंत्रीच नाही तर कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं कळतंय.

Maharashtra Cabinet : शिंदे गटात मंत्रिपदावरुन रस्सीखेच, आमदार संजय सिरसाट नाराज असल्याची चर्चा; कुणाची वर्णी लागणार?
संजय शिरसाट
Image Credit source: Google
Follow us on

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अशावेळी नव्या सरकारमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच पाहायला मिळतेय. शिंदे गटातील आमदार संजय सिरसाट (Sanjay Sirsat) नाराज असल्याची चर्चा आहे. औरंगाबादेतून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि संदिपान भुमरे यांची पुन्हा एकदा मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याचवेळी संजय सिरसाट मंत्रिपदासाठी अडून बसल्याची माहिती मिळतेय. औरंगाबादेत तीन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी संजय सिरसाट यांना एखादं महामंडळ किंवा अन्य कोणत्या पदावर बोलवणं होण्याचीच शक्यता वर्तवली जातेय. मात्र संजय सिरसाट हे राज्यमंत्रीच नाही तर कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं कळतंय.

दरम्यान, औरंगाबादेत भाजप नेते आणि आमदार हरिभाऊ बागडे, अतुल सावे आणि प्रशांत बंब हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. त्यामुळे एकट्या शिंदे गटाला औरंगाबादेतून तीन किंवा चार मंत्रिपदं मिळण्याची शक्यता कमीच आहे. असं असलं तरी संजय सिरसाट मात्र मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, शिंदे गटातील नेत्यांकडून त्यांची समजूत काढली जात असल्याची माहिती मिळतेय.

… तर औरंगाबाद मंत्र्यांचा जिल्हा

राजकीय सूत्रांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, सत्तार, भुमरे आणि शिरसाट यांना मंत्रीपदं मिळाली तर औरंगाबादेत एकूण पाच मंत्री होतील. आधीच भाजपचे डॉ. भागवत कराड हे केंद्रीय अर्थराज्यमंत्री आहेत. तर रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्य मंत्री आहेत. जालन्याचे असले तरीही रावसाहेब दानवे हे औरंगाबादचेच मानले जातात. औरंगाबादच्या जलाक्रोश मोर्चात त्यांनी घेतलेला पुढाकार सर्वांनीच पाहिलाय. त्यामुळे एकनाथ शिदेंच्या मंत्रीमंडळात औरंगाबादच्या आमदारांना स्थान मिळालं तर शहराचं राजकीय वजन निश्चितच वाढेल. शिवाय रखडलेल्या योजना पूर्णत्वास येण्यास मदत होईल, अशी आशा जनतेला आहे.

मंत्रिपदाचा फॉर्म्युला काय असणार?

नव्या सरकारमध्ये मंत्रिपदे वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. प्रत्येक सहा आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद देण्यात येणार आहे. मात्र, त्यात ऐनवेळी बदलही होऊ शकतो असंही सांगितलं जात आहे.

शिंदे गटाला विधानसभेचं उपाध्यक्षपद

शिंदे गटाला विधानसभेचं उपाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. या पदासाठी दीपक केसरकर यांची वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अपक्षांना अधिकाधिक संधी

शिंदे गटासोबत तब्बल 11 अपक्ष आहेत. त्यात बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात येणार आहे. तसेच इतर एक दोन अपक्षांना मंत्रिपद देऊन बाकीच्यांना महामंडळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.