10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं

| Updated on: Feb 12, 2022 | 6:18 PM

सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

10 मार्चनंतर महाविकास आघाडीला सत्ता सोडण्याची वेळ येईल! चंद्रकांत पाटलांचा पुनरुच्चार, कारणही सांगितलं
उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील
Follow us on

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारबाबत पुन्हा एकदा मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत आणि आघाडीचे मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की, महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल’, असा पुनरुच्चार चंद्रकांत पाटील यांनी केलाय. भाजपा कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसांकडून होत असलेल्या पक्षपाती कारवाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) आयुक्तांना निवेदन सादर केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

‘महाविकास आघाडी सरकारची सध्याची स्थिती पाहिली तर कोणीही विश्लेषण करणारा सांगू शकेल की, हे सरकार आता फार दिवस टिकणार नाही. आघाडीतील मतभेद उफाळले आहेत. दोन मंत्र्यांचा राजीनामा झाला. तसे बाकीच्यांचेही होतील. पोलिसांच्या बदल्यांबाबत माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांना अनिल देशमुख यांच्याकडून यादी मिळत होती असे सांगितले. तर देशमुख म्हणतात की, त्यांना शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याकडून मिळत होती व ते ती पुढे पाठवत होते. दुसरीकडे आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी सांगितले की, सचिन वाझे याला पुन्हा नोकरीत घेण्यासाठी त्यांच्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दबाव आणला होता. या गंभीर आरोपांनंतर आघाडीच्या नेत्यांनी काहीही संवेदनशीलता दाखवली नसली तर ही प्रकरणे गुन्ह्याची आहेत. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचा आदेश दिला तसा या गंभीर प्रकरणांबाबत न्यायालय न्याय देईल. अशी स्थिती निर्माण होईल की, आघाडीच्या नेत्यांना सत्ता सोडून घरी जावे लागेल’, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

‘पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार?’

पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड व एकूण संपूर्ण महाराष्ट्रात ज्या प्रकारे सत्तेचा दुरुपयोग चालू आहे तो आम्ही सहन करणार नाही. किरीट सोमय्या यांचा सत्कार करून काल पुण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवून दिले की, आम्हीही काही कमी नाही. पिंपरी चिंचवडमध्ये खोट्या केसेस करून पोलिसांमार्फत आम्हाला हे सरकार किती दाबणार असा आपला सवाल आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही. पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली नाही तर आपण न्यायालयात जाऊ.

काँग्रेस आणि आम आदमी पार्टीला टोला

पुण्यात भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गोमुत्र आणि गुलाबजल टाकून त्या पायऱ्या स्वच्छ केल्या. त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, काँग्रेसचा गोमुत्र आणि गाईवरील विश्वास वाढलेला पाहून आपल्याला खूप आनंद झाला.

इतर बातम्या :

Video : नवनीत राणा आणि पोलीस अधिकाऱ्यांत बाचाबाची; आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणावरुन अमरावतीत जोरदार राजकारण

राणेंचा लोकसभेत गडबड घोटाळा; केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे उत्तर, सभापतींनी कसे निस्तारले?