महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय : नवाब मलिक

| Updated on: Dec 20, 2020 | 6:15 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.

महाविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलंय : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतही महाविकास आघाडीनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढेल, असा दावा आतापर्यंत अनेक नेत्यांनी केला आहे. राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनीदेखील असे वक्तव्य यापूर्वी केले होते. दरम्यान, मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी काँग्रेस मुंबईत स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते मात्र तिन्ही पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार असल्याचे सांगत आहेत. (Mahavikas Aghadi has decided to contest Mumbai Municipal Corporation elections together: Nawab Malik)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक म्हणाले की, “फेब्रुवारीपासून आम्ही पक्षबांधणीच्या कामाला सुरुवात केली होती. त्यासाठी सभा सुरू झाल्या होत्या, परंतु कोरोनामुळे त्या थांबल्या. या सभा आणि बैठका आता पुन्हा सुरू झाल्या आहेत, आज नितीन देशमुख यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. महविकास आघाडी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढणार हे ठरलं आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन कामं करावी, असा प्रयत्न आहे”.

काँग्रेसच्या भाई जगताप यांनी मांडलेल्या भूमिकेबद्दल मलिक म्हणाले की, “आमची भूमिका एकत्र लढायची आहे, मुख्यमंत्र्यांनीही तसे स्पष्ट केले आहे. काही लोकांचे वैयक्तिक मत वेगळे असू शकते. मात्र काँग्रेसची अधिकृत भूमिका अजून त्यांनी जाहीर केलेली नाही. महाविकास आघाडीने मुंबई महापालिका निवडणुकीबाबतचा कोणताही फॉर्म्युला अद्याप ठरवलेला नाही, मुळात त्याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही”. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांच्या विक्रोळी पार्कसाईट येथील जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी नवाब मलिक बोलत होते. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते.

काँग्रेस हायकमांडकडून शनिवारी भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर आज भाईंनी मोठं वक्तव्य केलं. “मुंबईत काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे इतर सगळ्यांना विरोध राहील”, अशी घोषणाच जगताप यांनी केली आहे. मुंबईत कॅप्टन म्हणून बदल निश्चित करुन दाखवणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. माझ्या साथीला अनुभवी आणि चांगली टीम दिली आहे. नाराज नेत्यांना सोबत घेऊन काम करणार. सगळ्यांना बरोबर घेऊन काम करेन. कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करेन, असंही भाई जगताप म्हणाले.

नसीम खान यांचाही स्वबळाचा नारा!

दुसरीकडे काँग्रेसचेच नेते नसीम खान यांनी मुंबई महापालिकेचा सर्व 227 जागांवर आम्ही निवडणूक लढणार असल्याचं म्हटलंय. येत्या काळात काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढेल. गेल्या अनेक काळापासून शिवसेना आणि भाजपकडे महापालिकेची सत्ता होती. त्यामुळे रखडलेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणारच, असंही नसीम खान म्हणाले.

राज्य सरकारमध्ये काँग्रेसच्या आमदारांचे प्रश्न मार्गी लागत नाही. त्यांना निधी मिळत नाही, ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच सोनिया गांधींना हस्तक्षेप करावा लागल्याचंही खान म्हणाले. मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे. मला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, असंही खान यांनी सांगितलं.

सोनिया गांधींकडून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण

शिवसेना दिलेला शब्द पाळत नाही. कोणत्याही निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सामावून घेत नाही. एकहाती निर्णय घेतले जातात. असा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते रवी राजा यांनी केलाय. तसंच पुढील निवडणूक काँग्रेसने स्वबळावर लढवावी अशी मागणी राज्यातील नेत्यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केली होती. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कॉमन मिनिमम प्रोग्रामची आठवण करुन दिल्याचंही राजा यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं होतं.

संबंधित बातम्या:

…तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते; नवाब मलिक यांचं टीकास्र

Bhai Jagtap | मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

काँग्रेस पुन्हा फिरुन तिथेच? राहुल गांधी अध्यक्ष की प्रियंका?

(Mahavikas Aghadi has decided to contest Mumbai Municipal Corporation elections together: Nawab Malik)