Eknath Shinde : पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा दावा
Eknath Shinde : देशात अजून मतदानाचे चार टप्पे बाकी आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत तीन टप्प्यात मतदान झालय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पार पडलेल्या मतदानानंतर मोठा दावा केलाय. त्याचवेळी त्यांनी विरोधी पक्षात असलेल्या ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे. वेगवेगळ्या मुद्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे.
देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. आतापर्यंत देशात तीन टप्प्यांच मतदान झालय. अजून मतदानाचे चार फेज बाकी आहेत. देशात भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीमध्ये सामना आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई आहे. तीन टप्प्याच्या मतदानानंतर दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे करण्यात येत आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिली. “भाजपा 400 पारच स्वप्न पाहतेय. पण उद्धव ठाकरे म्हणतात भाजपाला 50 जागाच मिळणार, राहुल गांधी म्हणतात 100-150 जागाच मिळतील” त्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.
“विरोधी पक्षांनी काम केलय का? घरी बसणाऱ्याला कोणी मतदान करतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवस-रात्र 20-20 तास काम करतायत. देशाशिवाय दुसरा विचार करत नाहीत. देशाचा विकास, प्रगती मोदींच्या कार्यकाळात झालीय. 2014 आधी बॉम्बस्फोट, घोटाळे व्हायचे. 2014 नंतर बॉम्बस्फोट झाले का? भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का? पंतप्रधानांवर कुठलाही डाग नाहीय. 2014 आधी यांनी किती घोटाळे केलेत. आज देशात 10 वर्षात राज्यात 2 वर्षात काम झाली आहेत. 50-60 वर्षात काँग्रेसने जे केलं नाही, ते मोदींनी 10 वर्षात करुन दाखवलय. लोक कोणाला मत देणार? लोक काम करणाऱ्याला मत देणार की, काम न करणाऱ्याला?” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘त्यांनी राजकारणाचा स्तर खाली घसरवलाय’
इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलले. “त्यांनी राजकारणाचा स्तर खाली घसरवलाय. हे व्यक्तीगत, जातीनिहाय आरोप आहेत. जनता याला निवडणुकीत उत्तर देईल” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सॅम पित्रोदा यांनी भारतीयांची चिनी, अरबी, आफ्रिकन लोकांशी तुलना केली होती.
#WATCH | Thane: Maharashtra CM Eknath Shinde says, “Mahayuti is in majority in all three phases in Maharashtra and will perform well in all five phases… Mahayuti will win the maximum number of seats in the state… Maharashtra will play an important role in Prime Minister… pic.twitter.com/WIObJvJvYK
— ANI (@ANI) May 10, 2024
पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर स्थिती काय?
“पहिल्या तीन टप्प्याच्या मतदानानंतर महायुती बहुमतामध्ये आहे. सर्व पाच टप्प्यात महायुती दमदार प्रदर्शन करेल. महायुती राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकेल. 400 पार या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नामध्ये महायुती महत्त्वाची भूमिका बजावेल” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.