शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘मनातील मुख्यमंत्री’ कोण?

| Updated on: Nov 17, 2019 | 10:58 AM

महासेनाआघाडी सरकारने बाळासाहेबांची प्रतिमा समोर ठेवून कामकाज करावं, त्यामुळे ते चुकू शकणार नाहीत, अशा भावना मनोहर जोशींनी व्यक्त केल्या

शिवसेनेच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण?
Follow us on

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनी आदरांजली वाहण्यासाठी आलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना बाळासाहेबांच्या आठवणींनी गहिवरुन आलं. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशींच्या मनातही पुढील मुख्यमंत्रिपदासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंच नाव आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, ही सूचना अत्यंत योग्य असल्याचं जोशी (Manohar Joshi on Maharashtra CM) म्हणाले.

बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व अद्वितीय होतं. 45 वर्ष मी त्यांच्या सहवासात राहिलो, मात्र एकही दिवस कंटाळवाणा नव्हता. ते आदर्श आहेत, दैवत आहेत. ते महाराष्ट्राचा मोठा आधार होते, असं मनोहर जोशी ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना म्हणाले.

महासेनाआघाडी सरकारने बाळासाहेबांची प्रतिमा समोर ठेवून कामकाज करावं, त्यामुळे ते चुकू शकणार नाहीत, अशा भावना व्यक्त करतानाच, अर्थात हे उद्धव ठाकरेंना सांगायची गरज नसल्याचं जोशी म्हणाले.

महासेनाआघाडीत काही वैचारिक मतभेद होतील, मात्र त्यांनी ठरवलं तर वैचारिक मतभेद बाजूला ठेवता येतील. तीन पक्ष एकत्र आल्याने मी आश्चर्यचकित झालो होतो. मात्र राजकीय पक्षाने काही मुद्द्यांवर तरी एकत्र आलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, ही सूचना अत्यंत योग्य असल्याचं मनोहर जोशी यांनी म्हटलं.

बाळासाहेबांकडून स्वाभिमान जपण्याचा मूलमंत्र, फडणवीसांचा शिवसेनेला खोचक टोला

आघाडीत सामील होत असताना विचार हळूहळू बदलत आहेत. एकच भूमिका पकडून ठेऊ नये, चांगले स्वीकारत जावं, असा सल्ला मनोहर जोशी यांनी दिला. सेनेचं सरकार असावं, ही इच्छा आहे, मात्र सरकार महासेनाआघाडीचंच होईल, असा विश्वास जोशींनी बोलून दाखवला.

शिवसेनेचा भविष्यकाळ चांगला आहे. त्याची ही सुरुवात आहे. उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठरवलं तर ते केव्हाही एकत्र येऊ शकतात, याबद्दल आश्चर्य वाटणार नाही, असंही मनोहर जोशी (Manohar Joshi on Maharashtra CM) म्हणाले.