मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला, मतदारसंघही सूचवला

ओबीसींमध्ये राजकीय जागृती झाली आहे. याबाबत मला आनंद आहे. आता खऱ्या अर्थाने लोकशाहीची सुरुवात झाली असे मी मानतो. आपल्या अधिकारांची लढाई असे स्वरूप आता येत आहे आणि भाजपची धार्मिक विचारधारा गळून पडत आहे असे आम्ही मानत असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवावी, प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला, मतदारसंघही सूचवला
manoj jarange patil and prakash ambedkar
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 14, 2024 | 2:12 PM

मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना अखेर औषधोपचार घ्यावे लागले आहेत. त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाल्याने काळजी व्यक्त केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटील यांना एक सल्ला दिला आहे. त्यांनी स्वत:च्या शरीराची त्याग करण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. आता आरक्षण मिळविणे हे ध्यैय्य असावं असं आम्ही मानतो. म्हणून, जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना येथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथील पत्रकार परिषदेत केली आहे.

प्रकाश आंबडेकर यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही जरांगे पाटील यांना निरोप पाठवला आहे की, त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून घेण्यात काहीही अर्थ नाही. उपोषणातून जागृती करायची होती, ती झाली आहे. त्यांनी हा लढा आता राजकीय भूमिकेत लढावा असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोणत्याही पक्षाच्या आधाराने लढले, तर त्या पक्षांची बंधने येतात आणि बंधने असली की, गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येणार नाहीत. त्यामुळे जरांगे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, असेही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

गरीब मराठ्यांचे आणि ओबीसीचे ताट वेगळे हवे. पक्षाच्यावतीने आम्ही भूमिका जाहीर केली आहे की, ओबीसींच्या ताटात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, तसं झालं तर टिकणारे आरक्षण मिळणार नाही. म्हणून गरीब मराठ्यांचे ताट आणि ओबीसींचे ताट वेगळं असावं अशी आमची भूमिका असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी. ते निवडून येतील, अशी आम्हाला खात्री आहे. लोकसभेतून गरीब मराठ्यांचा प्रश्न सोडवण्यात येतो हे आम्ही त्यांना सांगणार आहोत. ते मान्य करतील अशी अपेक्षाही आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

..ते काँग्रेसवालेच सांगतील

पत्रकारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न विचाराला असता ॲड. आंबेडकरांनी म्हटले की, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये का गेले ? याचं उत्तर काँग्रेसवाल्यांनीच द्यायला पाहिजे. इतर कोणीच यावर उत्तर देऊ शकत नाही असे मला वाटते.