IND vs ZIM: टीम इंडियाचे धन्यवाद…भारताने पराभवाची धुळ चारुनही झिम्बाब्वे कर्णधार सिकंदर रझा असं का म्हणाला?
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका रंगली. जी भारतीय संघाने एकतर्फी जिंकली. आता यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने एक विधान केले ज्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला फारशी कामगिरी करता आली नाही. भारतीय संघाने ही मालिका 3-0 ने जिंकली. अखेर कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या नेतृत्त्वात पहिली मालिका जिंकता आली. या मालिकेपूर्वी भारतीय संघावर अनेक टीका होत होत्या. संघाची कामगिरी खूपच ढासळली होती. पण अखेर संघाने जोरदार कमबॅक केला आहे. आता तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाकडून पराभव झाल्याने झिम्बाब्वेने मालिका गमावली. यानंतर कर्णधार सिकंदर रझाने एक महत्त्वपूर्ण विधान केले.
झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान, भारतीय संघाच्या वैभव सूर्यवंशीने फलंदाजीत मोठी धावसंख्या उभारली, तर मयंक यादवनेही गोलंदाजीत चांगली कामगिरी केली. तिसऱ्या सामन्यात वैभवने 81 धावा केल्या, तर मयंकने तीन बळी घेतले. परिणामी, भारतीय संघाने तिसरा सामना 35 धावांनी जिंकून झिम्बाब्वेला तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत क्लीन स्वीप दिला. मालिकेतील तिन्ही सामने गमावल्यानंतर सिकंदर रझा म्हणाला, “भारतीय खेळाडू खेळायला आले, यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. मोठ्या संघांविरुद्ध खेळल्याने आमच्या खेळाची सध्याची पातळी दिसून येते. यामुळे आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढतो.”
तीन सामन्यांच्या मालिकेवर नजर टाकल्यास, कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर, भारतीय संघाने अखेर झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा मार्ग शोधला. भारतीय संघासाठी तिन्ही सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीच्या बॅटने 151 धावा करून धुमाकूळ घातला. यामुळे त्याला अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला आणि तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले. झिम्बाब्वेचा दौरा वैभवसाठी अविस्मरणीय ठरला आणि तो आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मालिकावीर म्हणून मायदेशी परतणार आहे. भारतीय संघ आता सप्टेंबरमध्ये जपानमध्ये 2026 च्या आशियाई खेळांसाठी टी-20 क्रिकेट खेळेल, तर भारतीय कसोटी संघ ऑगस्टमध्ये श्रीलंकेचा दौरा करेल.
श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ लवकरच जाहीर होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन सामन्यांची ही मालिका असणार आहे.
