सोनम वांगचूक पुन्हा मैदानात, आता नव्या आंदोलनाची घोषणा, यावेळी नेमका कोणता मुद्दा?
लडाखला अधिक स्वायत्तता मिळावी, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि प्रशासनात स्थानिकांचा सहभाग वाढावा, या मागण्यांसाठी वांगचुक सातत्याने आवाज उठवत आहेत. गेल्या वर्षी लडाखमधील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते.

Sonam Wangchuk Protets : कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतर -मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनात लडाखमधील प्रश्नांवर आवाज उठवणारे सोनम वांगचूक यांनीही उपोषण केले. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या आंदोलनापासून सोनम वांगचूक देशभरात ओळखले जाऊ लागले. दरम्यान, आता याच सोनम वांगचूक यांनी लडाखमधील विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सरकारने लडाखशी संबंधित प्रमुख मागण्यांवर ठोस निर्णय घेतला नाही, तर 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान नव्याने आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा वांगचुक यांनी केली आहे.
काही महिन्यांपूर्वी वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. त्यानंतर आता केंद्र सरकार आणि लडाखमधील प्रतिनिधींच्या चर्चेत अपेक्षित प्रगती होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लडाखच्या लेह अपेक्स बॉडी (LAB) आणि कारगिल डेमोक्रेटिक अलायन्स (KDA) यांच्या प्रतिनिधींची केंद्रीय गृह मंत्रालयाच्या उपसमितीसोबत बैठक झाली. या बैठकीत UT-लेवल बॉडीची संरचना, या संस्थेची शक्ती तसेच अन्य मुद्द्यांवर ड्राफ्ट सादर केला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैठकीत असा कोणताही मसुदा समोर आला नसल्याने वांगचुक यांनी निराशा व्यक्त केली.
वांगचुक यांच्या म्हणण्यानुसार, 22 मे रोजी झालेल्या बैठकीनंतर विशेष प्रगती झालेली नाही. गृह मंत्रालयाकडे या काळात पुरेसा वेळ असूनही अपेक्षित काम झाले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याऐवजी पुढील बैठकीत चर्चेसाठी प्रश्नांची यादी प्रतिनिधींना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लडाखला अधिक स्वायत्तता मिळावी, स्थानिकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे आणि प्रशासनात स्थानिकांचा सहभाग वाढावा, या मागण्यांसाठी वांगचुक सातत्याने आवाज उठवत आहेत. गेल्या वर्षी लडाखमधील आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर मार्चमध्ये त्यांची सुटका झाली.
यापूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जंतर-मंतरवर उपोषणातही सहभाग घेतला होता. आता लडाखच्या प्रश्नांवर सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास सप्टेंबरमध्ये पुन्हा आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
