भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय, नाना पटोलेंचा घणाघात

| Updated on: Jun 02, 2021 | 9:37 PM

मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबत आढावा घेण्यात आला.

भाजप सामाजिक वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजतंय, नाना पटोलेंचा घणाघात
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणापाठोपाठ आता राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुनही जोरदार राजकारण रंगलं आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा, ओबीसी आणि अन्य आरक्षणाबाबत आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रात भाजप सामाजिक वाद निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचं काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. (Nana Patole criticizes BJP on the issue of Maratha and OBC reservation)

राज्यातील आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर काँग्रेसला काय भूमिका मांडता येईल, याबाबत आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. या बैठकीत मराठा, ओबीसी, पदोन्नतीतील आरक्षणाबाबत चर्चा झालीय. राज्यात 2017 पासून मागासवर्गियांवर अन्याय सुरु आहेत. भाजप मोठ्या प्रमाणात खोटं बोलण्याचं काम करतंय. महाविकास आघाडी सरकार कुठेही अडचणीत नाही, असा दावाही पटोले यांनी केलाय. भाजप ओबीसीविरोधी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. भाजपने संपूर्ण देशातील ओबीसी समाजाला अडचणीत आणलं, असा आरोपही पटोले यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीसांवर पटोलेंची टीका

मुंबई महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी 2 वर्षे नागपूर जिल्हा परिषद निवडणूक होऊ दिली नव्हती. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर निवडणुका लागल्या, असं पटोले म्हणाले. त्याचबरोबर 7 जुलैला होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांचे नाव घोषित केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी दिलीय.

‘भाजपने ओबीसी समाजाचा घात केला’

भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, अशी टीकाही पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी असल्याचा घणघात पटोले करत आहेत.

संबंधित बातम्या :

‘त्या’ १२ आमदारांचा प्रस्तावच विचाराधीन! संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे? भाजपचा सवाल

‘मातोश्री’ने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही – देवेंद्र फडणवीस

Nana Patole criticizes BJP on the issue of Maratha and OBC reservation