Tv9 EXCLUSIVE : धनंजय मुंडे तुमच्या कानात काय बोलले? मनोज जरांगे म्हणाले…

मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभरात सभा घेत आहेत. ते आपल्या भाषणांमधून सरकारला आरक्षणासाठी आवाहन करत आहेत. मराठा समाजाला 24 डिसेंबरपर्यंत कुणबी आरक्षण मिळेल, असा त्यांना विश्वास आहे. जरांगे यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

Tv9 EXCLUSIVE : धनंजय मुंडे तुमच्या कानात काय बोलले? मनोज जरांगे म्हणाले...
Chetan Patil | Updated on: Nov 24, 2023 | 5:44 PM

मुंबई | 24 नोव्हेंबर 2023 : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. धनंजय मुंडे तुमच्या कानात काय बोलले? आरक्षण दिलं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देणार असं धनंजय मुंडे तुमच्या कानात म्हणाले का? असे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आले. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “ते तरी कुठे खोटं बोलतात, त्यांना तुम्ही विचारुन बघा. कानात काही कशाला बोलतील, लांब होते. आता मी कुणाला कानात बोलूच देत नाही. ते बोलले ते बऱ्याच जणांना ऐकूही आलं. पण ठीक आहे. ते एकदा शब्द दिल्यावर तेही बदलत नाहीत. त्यांची तितकी ख्याती आहे”, असं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलं.

“सरकारच्या शिष्टमंडळाने आरक्षण दिलं जाईल, असं सांगितलं आहे. त्यांनी लेखी आरक्षण दिलं जाईल, असं सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांना आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली आहे. त्यामुळे 24 डिसेंबरपर्यंत आश्वासनाची पूर्तता नाही झाली तर पुढे काय? असा प्रश्न मनोज जरांगे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

‘आंदोलन करण्याची तशी वेळ येणार नाही’

“आम्हाला वाटत नाही की सरकारकडून आश्वासनाची पूर्तता होणार नाही. शंभर टक्के आश्वासनाची पूर्तता होईल. सरकार आम्हाला आरक्षण देणारच, कारण आमचे पुरावे सापडले आहेत. आम्ही कायद्यात बसतोय. ओबीसी समाजात समाविष्ट करण्यासाठी पुरावे सापडले तर त्या जातीला समूहाला आरक्षणात घ्यावं लागतं. हे सरकारला क्रमप्राप्त आहे आणि ते घेतील. आमच्यावर आंदोलन करण्याची तशी वेळ येणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘आरक्षण नाहीच दिलं तर मग…’

“आम्हाला आरक्षण नाहीच दिलं तर मराठा समाज सज्ज आहे. आम्ही 24 डिसेंबरनंतर बैठक घेऊन मराठा समाजाला विश्वासात घेऊ. त्यातून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की, 24 डिसेंबरपर्यंत वेळ द्या. तुम्ही उपोषण मागे घ्या. मराठा समाजाने मुख्यमंत्र्यांच्या शब्दांचा आदर केला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील. मराठ्यांना शंभर टक्के आरक्षण देतील. कारण पुढचं आंदोलन त्यांना जड जाईल”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us