पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे

| Updated on: Jun 14, 2021 | 2:54 PM

खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं.

पक्ष-बिक्ष सोडा, आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो : उदयनराजे
खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट
Follow us on

पुणे : पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. (Maratha reservation issue Meeting between MP UdayanRaje and MP SambhajiRaje)

पाच बोटं एकसारखे नसतात, सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत, सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवलं जात आहे. पक्ष-बिक्ष इथे आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याने कायदा करावा. विशेष अधिवेशन बोलवा आणि कायदा करा. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडा. सभागृहात एक आणि बाहेर एक असं बोलू नका, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला सुनावलं.

ती वेळ येऊ देऊ नका

23 मार्च 1994 ला जीआर काढून आरक्षण देता, ते रद्द करु नका. मग जीआर काढून मराठ्यांनाही आरक्षण द्या. आम्ही जातपात पाहिली नाही. पण आज जाणवत आहे, बोलताना मित्र अंतर ठेवत आहेत. ही दुफळी राज्यकर्त्यांनी निर्माण केली. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. राज्यकर्त्यांची इच्छा असेल, तर समाजाशाठी एकत्र यावं. संभाजीराजे किंवा मी दुफळी निर्माण केली नाही. द्यायचं असतं तर मागेच दिलं असतं, यांची इच्छाशक्तीच नाही. त्यामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. राजकारणी व्यक्तीकेंद्रीत झालेत. उद्या जर तरुणांचा उद्रेक झाला तर त्याला जबाबदार ते असतील. त्यावेळी ना उदयनराजे, ना संभाजीराजे हा उद्रेक थांबवू शकणार नाहीत. आम्ही दोघे आडवे पडलो तरी आमच्यावर घणाघात होईल, आम्हाला बाजूला केलं जाईल..अशी वेळ येऊ देऊ नका, पण ती येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

समाजात तेढ निर्माण करू नका

मंडल आयोगाने ओबोसींना आरक्षण दिले. त्यावेळी दिल्लीतच होतो. तेव्हा दिल्लीत आरक्षण विरोधक आणि समर्थकांची रस्त्यावरच भोसकाभोसकी सुरु होती. मी दिल्लीत होतो ते मला आठवतंय… तुम्ही इशू बेस पॉलिटिक्स करा. समाजात तेढ निर्माण करू नका. कोर्ट कचेऱ्यावर मला अजिबात आता विश्वास नाही, काय घडणार हे मला माहिती आहे, असं ते म्हणाले.

आडवा आणि गाडा, जाब विचारा

माझा पाठिंबा संभाजीराजेंना आहे. मराठ्यांना आरक्षण हे एकच ध्येय आहे. राज्यकर्त्यांना फार मुभा दिली. निवडून आलं म्हणजे आपलं सगळं असं समजू नका. लोकशाहीचे हे राजे आहेत, त्यांना जाब विचारला पाहिजे. माझं ठाम मत आहे, आडवा आणि गाडा, जाब विचारा.. सुरुवात माझ्यापासून करा. आमच्या वाड्यावर येऊन विचारा… माझ्याप्रमाणे सर्वांना विचारा.. खरं खोटं करा.. किती काळ संभ्रमावस्थेत ठेवणार, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

संभाजीराजे जंटलमॅन, ते बोलणार नाहीत, पण कुणाला कुठं गाठायचं हे मी बघतो: उदयनराजे

उद्रेक झाला तर जबाबदार कोण?, कोर्ट कचेऱ्यांवर विश्वास नाही: उदयनराजे भोसले

Maratha reservation issue Meeting between MP UdayanRaje and MP SambhajiRaje