दिल्लीतील गाठीभेटीनंतर राज्यात भाजपची खलबतं, कोअर कमिटीच्या बैठकीत कोणत्या विषयांवर खल?

| Updated on: Jun 08, 2021 | 7:20 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. या दिल्लीतील गाठीभेटींसह विविध विषयांवर चर्चा सुरु असल्याचं कळतंय.

दिल्लीतील गाठीभेटीनंतर राज्यात भाजपची खलबतं, कोअर कमिटीच्या बैठकीत कोणत्या विषयांवर खल?
देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील
Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राज्यातील विविध विषयांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजधानी दिल्लीत भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्यानंतर ठाकरे आणि मोदी यांच्यात बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाल्याचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यावरुन राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपच्या गोटात हालचाली पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु आहे. या दिल्लीतील गाठीभेटींसह विविध विषयांवर चर्चा सुरु असल्याचं कळतंय. (BJP’s core committee meeting in Mumbai)

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा?

  1. राज्यातील राजकीय घडामोडींचा आढावा
  2. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर खल
  3. पक्षवाढीत्या दृष्टीकोनातून राज्याचा आढावा
  4. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका
  5. महापालिका निवडणुकीतील भाजपची स्थिती

कोअर कमिटीच्या बैठकीला कोणते नेते उपस्थित?

  • राष्ट्रीय संघटन मंत्री बी.एल. संतोष
  • विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
  • प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
  • आशिष शेलार
  • गिरीश महाजन
  • संजय कुटे
  • पंकजा मुंडे
  • मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा
  • चंद्रशेखर बावनकुळे

ठाकरे-मोदी भेटीवर फडणवीस काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले असतील तर ती चांगली गोष्ट आहे. राज्याने जर केंद्राशी समन्वय ठेवला तर राज्याचा फायदा होतो. उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं हे चांगलं नाही. आज ते पंतप्रधानांना भेटले ही चांगली गोष्ट आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची वैयक्तिक भेट घेतली की नाही याबाबत मला माहिती नाही. पण मी जेव्हा डेलिगेशन घेऊन जायचो तेव्हा 5 ते 10 मिनिटे ते डेलिगेशनशी चर्चा करतात आणि मग मुख्यमंत्र्यांशी 5 ते 10 मिनिटे वेगळी चर्चा करतात. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि ठाकरे यांची वेगळी भेट झाली असेल तर त्याच आश्चर्य वाटण्यासारखं काही नसल्याचं फडणवीस म्हणाले.

‘आम्हाला नेलं असतं तर आनंदच झाला असता’

त्याचबरोबर आम्हाला सोबत नेलं असतं तर आनंदच झाला असता. मात्र, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ही भेट प्रि-मॅच्यूअर आहे. कारण, न्यायमूर्ती भोसले यांच्या समितीचा अहवाल पाहिला असेल तर त्या समितीने मराठा आरक्षणा पुन्हा मिळवायचं असेल तर काय केलं पाहिजे हे या अहवालात सांगण्यात आलंय. त्या अहवालात राज्याने राज्य मागासवर्ग आयोग स्थापन करुन पुढची कार्यवाही करावी लागेल असं सांगितलं आहे. पण ति करण्यात आलेली नाही. पण ठीक आहे, भेट घेतली आहेत तर त्याचा फायदाच होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे, अजित पवार दिल्ली दरबारी मोदींच्या भेटीला, फोटो ट्वीट करत रोहित पवारांचं 2 शब्दांत वर्णन!

उद्धव ठाकरे- नरेंद्र मोदी भेटीचे तीन अर्थ, फडणवीस-पवार भेटीशी संबंध आहे का?

BJP’s core committee meeting in Mumbai