Delhi Farmer Tractor Rally | शेतकरी चर्चेने थकून गेले, त्यांचा अंत पाहिला गेला, पण पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही : बाळासाहेब थोरात

| Updated on: Jan 26, 2021 | 6:41 PM

चर्चेने थकून जावं, त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न सुरु आहे," असेही बाळासाहेब थोरात म्हणाले. (Balasaheb Thorat Comment on Delhi Farmer Tractor Rally) 

Delhi Farmer Tractor Rally | शेतकरी चर्चेने थकून गेले, त्यांचा अंत पाहिला गेला, पण पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही : बाळासाहेब थोरात
बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : गेल्या 61 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकरी अभूतपूर्व आंदोलन करत आहेत. थंडी, वाऱ्यात दोन महिने आंदोलन करत आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधी विचारपूस केली नाही. हा प्रजासत्ताक आहे का? असा सवाल महसूल मंत्री आणि कांग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे. (Balasaheb Thorat Comment on  Delhi Farmer Tractor Rally)

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं. या रॅली दरम्यान पोलीस आणि शेतकरी आमने सामने आले आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या असून त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

“गेल्या 61 दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर शेतकरी आंदोलन करतात. हे शेतकरी पंजाब, हरियाणाचे आहेत. या शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आहेत. देश उपाशी असताना ज्या शेतकऱ्यांनी देशाला अन्न पुरवलं तेच हे शेतकरी आहेत.”

“या शेतकऱ्यांनी थंडी, वाऱ्यात दोन महिने आंदोलन करत आहेत. मात्र पंतप्रधानांनी साधी विचारपूस केली नाही. हा प्रजासत्ताक आहे का? जनतेची साधी विचारपूस केली जात नाही. चर्चेने थकून जावं, त्यांचा अंत पाहण्याचा प्रयत्न सुरु आहे,” असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.

“शेतकरी आज वेगळ्या मार्गाने गेले, त्या मार्गाने जाऊ नये हा गांधींचा देश आहे. खलिस्तानी म्हणणं गुंड म्हणणं या पातळीवर भाजप गेलेले आहे. 61 दिवसात त्यांची मानसिकता काय झाली असेल, ते बघायला हवं. शांततेत आंदोलन सुरू असताना अडचणी निर्माण केल्या गेल्या. दिल्लीतील शेतकरी आंदोलनला हिंसक वळण लागलं, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे,” असेही थोरात यांनी सांगितले.

दिल्लीतील मेट्रो सेवा बंद

नवी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीवर पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर दिल्लीत तणाव निर्माण झाला आहे. आयटीओ येथे शेतकऱ्यांनी पोलिसांची व्हॅन, क्रेन ताब्यात घेतली आहे. त्यामुळे पोलीस या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करत आहे. शेतकरी आंदोलन अधिकच चिघळल्याने दिल्लीतील मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा एक गट लाल किल्ल्यावर धडकला

दिल्ली सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर मार्च काढण्यात आले होते. मात्र, यापैकी काही शेतकरी नियोजित मार्ग सोडून लाल किल्ल्यावर जाऊन पोहोचले. काही आक्रमक आंदोलकांनी लाल किल्ल्यावर तिरंगा झेंड्याच्या शेजारी असलेल्या एका खांबावर चढून शेतकरी संघटनेचा झेंडाही लावला. यानंतर आक्रमक आंदोलनकांपैकी अनेकांनी लाल किल्ल्यावर ठिकठिकाणी चढून शेतकरी संघटनेंचे झेंडे फडकावले. विशेष म्हणजे यावेळी अनेक शेतकरी आंदोलक हातात तिरंगा झेंडा फडकावत सरकारचा निषेध करतानाही दिसले. (Balasaheb Thorat Comment on Delhi Farmer Tractor Rally)

संबंधित बातम्या : 

Delhi Farmers Tractor Rally | केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा, टोकाची भूमिका घेऊ नये : शरद पवार

गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा