Bakrid 2020 | बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी नाही : नवाब मलिक

| Updated on: Jul 27, 2020 | 11:24 PM

कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी कुर्बानीसाठी कोणतीही बंदी असणार (Minister Nawab Malik On Bakrid 2020 Guidelines) नाही, असे सांगितले

Bakrid 2020 | बोकडाच्या वाहतुकीवर आणि कुर्बानीसाठी कोणतीही बंदी नाही : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जारी केली आहे. या नियमावलीनंतर बोकडाच्या कुर्बानीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. राज्य सरकारने कुर्बानीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे नवाब मलिक म्हणाले. (Minister Nawab Malik On Bakrid 2020 Guidelines)

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुस्लिम नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर नवाब मलिक यांनी बकरी ईद संदर्भातील नियमावलीवर स्पष्टीकरण दिलं. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाही. गृहमंत्री अनिल देशमुख याबाबतचे गैरसमज अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. तसेच बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबधीत अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही कोणतीही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाईन बुक केली असेल. त्यांनाही बकरी मिळेल,” असे नवाब मलिक म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली नंतर काही मुस्लिम नेते नाराज असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर शरद पवारांनी मुस्लिम नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह काँग्रेस, समाजवादीचे नेते उपस्थित होते. या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांची माहिती अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिली. बकरी ईदच्या नियमावलीवर मुस्लिम नेत्यांचं नेमकं म्हणणं काय याबाबतही अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना सांगितले.

“शरद पवार यांचे खूप आभारी” 

“मंत्रिमंडळातील नेत्यांची नियमावली तयार करण्याची जबाबदारी असते. पण सगळे तमाशा बघत आहेत. आज सर्व मुसलमान त्रस्त आहेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यांचे बकरे पावसाच्या पाण्यात भिजत आहेत, बकऱ्यांचा मृत्यू होत आहे. या सणानिमित्ताने शेतकऱ्यांना 300 ते 400 कोटी रुपये मिळतात.”

“शरद पवार यांचे आम्ही खूप आभारी आहोत की, त्यांनी आमची बाजू ऐकून घेतली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची सूचना दिली आहे. आम्ही सर्व मुख्यमंत्र्याकडे आमची बाजू मांडणार आहोत. सरकारने ट्रान्सपोर्ट बंद केला आहे. त्यामुळे नाशिकहून किंवा इतर भागातून ट्रकभरुन येणारे बकरे मुंबईत कसे येणार? हा मुद्दा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत”, अशी प्रतिक्रिया समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी दिली. (Minister Nawab Malik On Bakrid 2020 Guidelines)

संबंधित बातम्या : 

Bakrid 2020 | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत बैठक, मुस्लिम नेत्यांचं काय ठरलं?

Bakra Eid | नियम फक्त आम्हालाच, तुम्हाला सूट, बकरी ईदच्या नियमावलीवर इम्तियाज जलील आक्रमक