रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध टोकाला? गोगावले म्हणाले सर्व वाद मिटवू

| Updated on: Sep 23, 2021 | 7:14 PM

आमच्यात आणि राष्ट्रवादीमध्ये थोडीबहूत नाराजी आहे. येत्या सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू. मात्र, टोकाची भूमिका घेण्याइतकं कोणतंही कारण नाही, असं शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध टोकाला? गोगावले म्हणाले सर्व वाद मिटवू
भरत गोगावले, आमदार, शिवसेना
Follow us on

रायगड : अनंत गिते यांनी टीका केली त्या कार्यक्रमाला मी नव्हतो. मी फक्त बातम्या ऐकल्या. पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या पक्षाचे आदेश पाळतात, तर आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश पाळतो. आमच्यात आणि राष्ट्रवादीमध्ये थोडीबहूत नाराजी आहे. येत्या सोमवारी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू. मात्र, टोकाची भूमिका घेण्याइतकं कोणतंही कारण नाही, असं शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेही उपस्थित होते. (MLA Bharat Gogavale’s opinion on the dispute between ShivSena and NCP)

महाड पूर नियंत्रण समितीच्या बैठकीनंतर खासदार तटकरे आणि आमदार गोगावले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रायगडमधील आमदार थोरवे आणि आमदार दळवी यांनी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसबाबत उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बोलताना गोगावले यांनी डीपीडीसी बैठकीनंतर आम्ही सर्व वाद मिटवू असं गोगावले म्हणाले.

शिवसैनिकांमध्ये राष्ट्रवादीविरोधात नाराजी

दरम्यान, शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाही. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे, असं शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले होते. गिते यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेनेला हादरे बसताना दिसत आहेत. शिवसैनिकांची मतं जाणून घेण्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेना आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गुप्त बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी अनेक शिवसैनिकांनी खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री अदिती तटकरे यांच्याबाबत तक्रारी केल्या आहेत. आघाडीतील प्रमुख पक्ष असूनही शिवसेनेला जिल्ह्यात योग्य सन्मान मिळत नाही. तटकरे शिवसेनेचं खच्चीकरण करत आहेत. जिल्हा नियोज समितीमध्येही भेदभाव होते, अशी तक्रार देसाईंकडे करण्यात आलीय.

अनंत गीते यांची नेमकी टीका काय?

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

इतर बातम्या :

‘दिल्लीवरुन फोन आल्यानं राज्यपालांनी सही केली असेल’, नाना पटोलेंचा खोचक टोला

राज्यसभेसाठी भाजपा काँग्रेससोबत सौदेबाजी करतंय का? फडणवीसांचं पहिल्यांदाच खणखणीत उत्तर

MLA Bharat Gogavale’s opinion on the dispute between ShivSena and NCP