Santosh Bangar : सटॅsssक! संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ पाहाच

| Updated on: Aug 15, 2022 | 4:30 PM

कामगारांसाठी असलेल्या मध्यान्ह भोजन योजनेत निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी उघडकीस आणले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. आणि थेट व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली.

Santosh Bangar : सटॅsssक! संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ पाहाच
आ. संतोष बांगर
Follow us on

हिंगोली : आपल्या आक्रमक स्वभावामुळे अल्पावधीतच (Santosh Bangar) आ. संतोष बांगर हे चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवाय जनतेला विसर पडताच त्यांचा वेगळा असा व्हिडीओ हा व्हायरल होतोच. शिवसेनेतून बंड केल्यानंतर गद्दार कोण म्हणेल त्याच्या कानशिलात लावा असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर हॉस्पीटलच्या बिलावरुन एका डॉक्टरला फोनवरुन दिलेल्या धमकी ऑडिओ क्लिप तुफान व्हायरल झाली होती. याचा विसर पडत असतानाच पुन्हा एकदा आ. बांगर हे चर्चेत आले आहेत. यावेळी कारण आहे ते, कामगारांसाठी असलेल्या (Midday meal) मध्यान्ह भोजनाचा निकृष्ट दर्जा. एका उपहारगहाची पाहणी करीत असताना अन्नाचा (Poor quality) निकृष्ट दर्जा पाहून बांगर यांचा पारा चढला आणि त्यांनी उपहागृह व्यवस्थापकाच्या कानशिलातच लगावली. त्यामुळे पुन्हा आ. बांगर हे चर्चेत आले आहेत.

नेमका काय घडला प्रकार?

आता कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी ही खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. मात्र, कंत्राटदारांकडून कामगारांना खाण्यायोग्यही अन्न दिले जात नाही. हिंगोली जिल्ह्यातील एका उपहारगृहाला बांगर यांनी भेट दिली असती तेथील प्रकार उघडकीस आला आहे. मध्यान्ह भोजनात आळ्या आणि माशा पडलेल्या त्यांच्या निदर्शनास आले. एवढेच नाही तर प्रत्येक गोष्टीची त्यांनी पाहणी केली. याबाबत उपहारगृहाच्या व्यवस्थापकास विचारणा केली असता हे चुकून झाले, येथून पुढे होणार नाही असे म्हणताच बांगर यांनी त्याच्या कानशिलात लगावली.संबंधित कंत्राटदाराकडून अत्यंत निकृष्ट दर्जाचा आणि शासनाने ठरवून दिलेल्या मेन्यूचा कोणताही अवलंब न करता जेवण कामगारांना दिले जात होते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा अशी मागणी आमदार बांगर यांनी केली आहे.

जनावरांनाही खाण्यायोग्य भाजीपाला नाही

जिल्ह्यातील गावा गावात जाऊन टेम्पो च्या माध्यमातून कामगारांना डब्बे पुरवले जात आहेत. मात्र, हे सगळे भोजन निकृष्ट दर्जाच असल्याचा आरोप आ. संतोष बांगर यांनी केला आहे. लिंबाळा येथिल मध्यान्ह भोजनाच्या किचनची आ. संतोष बांगर यांनी पाहणी केली असता त्या ठिकाणी सर्व भाजीपाला अक्षरशः जनावरे खाणार नाहीत अशी गोबी,सडलेले कांदे, बुरशी आलेल्या पोळ्या, डाळी नेमवून दिलेल्या दिवसांचा मेनू दिला जात नाही आणि जे भोजन दिले जाते ते निकृष्ट दर्जाच्या असल्याचे बांगर यांनी सांगितले आहे.

कारवाईची मागणी

कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असून यामधून आर्थिक स्वार्थ साधला जात आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराची चौकशी करुन त्यावर कारवाई करण्याची मागणी बांगर यांनी प्रशासनाकडे केली आहे. शिवाय संबंधित कंत्राटाला हे काम मिळालेच कसे याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.