मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर मनसेचे पहिल्यांदाच भाष्य

| Updated on: Oct 16, 2020 | 1:29 PM

फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे" असा घणाघात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर, बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनवर मनसेचे पहिल्यांदाच भाष्य
Follow us on

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन यामुळे निर्माण झालेल्या वादावर मनसेने पहिल्यांदाच भूमिका व्यक्त केली आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दरडावल्यानंतर मनसेनेही बॉलिवूड ड्रग्ज वादात उडी घेतली आहे. अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन तंत्रज्ञ आणि कलाकारांना धीर दिला आहे. (MNS Ameya Khopkar on Bollywood Drugs Connection)

“भूतकाळातही बॉलिवूडमधील कलाकारांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली, त्यांना शिक्षा झाल्या, पण म्हणून कुणीही पूर्ण बॉलिवूडलाच खलनायक ठरवलं नाही. आता मात्र जाणीवपूर्वक बॉलिवूडलाच बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. एवढंच नाही, तर फिल्मसिटीच मुंबईबाहेर हलवायचं कुटील कारस्थान रचलं जात आहे” असा घणाघात अमेय खोपकरांनी केला.

“महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही असली कारस्थानं कधीही यशस्वी होऊ देणार नाही. तंत्रज्ञांपासून कलाकारांपर्यंत कुणीही घाबरायची गरज नाही, कारण राजसाहेबांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि यापुढेही राहणार, हा आमचा शब्द आहे” अशी हमी खोपकर यांनी ट्विटरवरुन दिली.

अमेय खोपकर काय म्हणाले?

  • महाराष्ट्रात बॉलिवूडला बदनाम करण्याचा राजकीय कट रचला जात आहे. मुंबईतून बॉलिवूड बाहेर नेण्याचा कुणी विचारही करू नये. हा विचार नक्की होतोय. पण ते कधीही यशस्वी होणार नाहीत. कारण मनसे बॉलिवूडमधल्या चांगल्या लोकांच्या पाठीशी आहे. बॉलिवूडला मुंबईतून बाहेर जाऊ देणार नाही.
  • ड्रग्जचं प्रमाण इंडस्ट्रीत नाही, असं मी म्हणणार नाही. काही प्रमाणात लोक आहेत. पण पूर्ण इंडस्ट्रीला बदनाम करणं चुकीचे आहे. मनसे कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी भांडत राहील. जी केस आहे ती सीबीआयकडे आहे, त्यावर आम्ही भाष्य करणार नाही.
  • माझी सगळ्या राजकीय पक्षांना विनंती आहे बॉलिवूड मुंबईबाहेर जाता कामा नये, जो कुणी हा प्रयत्न करेल, त्याला मनसे आपल्या स्टाईलने उत्तर देईल.
  • राजकीय मतभेद बाजूला ठेवा आणि पण मुंबईतून बॉलिवूड बाहेर गेले नाही पाहिजे… एक व्हा !
  • देशात अनेक फिल्मसिटी आहेत म्हणून बॉलिवूड बाहेर गेली आणि संपली असे नाही. आज राज्यकर्त्यांना का वाटत नाही की दादासाहेब चित्रनगरीत जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा उभाराव्यात?
  • मुंबईचे महत्व कमी करावे याची ताकद कुणात नाही
  • चांगली चित्रनगरी उभी करण्याची इच्छाशक्ती राज्य सरकारमध्ये नाही.
  • मनसे बॉलिवूडला मुंबईबाहेर जाऊ देणार नाही. जे जे शक्य आहे ते ते करू
  • गुजरातमध्ये एवढे शूटिंग होते आहे का ? का महाराष्ट्रातून लोकांना बाहेर शूटिंग साठी जावे असे का वाटते? राज्य सरकारने विचार करावा
  • सुशांत प्रकरण किंवा बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन यावर CBI-NCB चौकशी सुरू आहे. प्रकरण कोर्टात आहे. मी यावर काही भाष्य करणार नाही

नेमका वाद काय?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात सिने इंडस्ट्री निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले असून या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल इशारा दिला होता.

“मुंबई ही महाराष्ट्राची आर्थिकच नाही तर सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखली जाते. आज हॉलिवूड सिनेमांच्या तोडीस तोड असे सिनेमे बॉलिवूडमध्ये बनत आहे. या बॉलिवूड सिनेमांचा चाहतावर्ग जगभर आहे. सिनेमासृष्टी हा एक मोठे मनोरंजन उद्योगक्षेत्र असून या क्षेत्रामुळे अनेकांना रोजगाराची संधी मिळते तर सिनेमांमुळे आपले कलाकार लोकप्रिय होतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून काही ठराविक वर्गाकडून बॉलिवूडला बदनाम करण्यात येत आहे, ही बाब अत्यंत वेदनादायक आहे. बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत ते कधीही सहन केले जाणार नाहीत” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

संबंधित बातम्या :

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही; उद्धव ठाकरे गर्जले!

(MNS Ameya Khopkar on Bollywood Drugs Connection)